निष्ठेला मनात स्थान नाही हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे – आदित्य ठाकरे

मुंबई : १७ ऑगस्ट – जे गद्दार सोबत गेले त्यांचा गेम कसा केला हे सर्वांनाच दिसत आहे. मंत्रीमंडळ विस्तारात खऱा मुख्यमंत्री कोण हे सर्वांना कळलं आहे. अपक्षांना, महिलांना काही स्थान देण्यात आलेलं नाही. मुंबईकरांनाही काही स्थान देण्यात आलेलं नाही. सर्वात प्रथम जाणारे १४-१५ जण जे निष्ठावंत होते, त्यांनाही स्थान दिलं नाही. निष्ठेला मनात स्थान नाही हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे अशी टीका शिवेसना आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून, विधीमंडळाबाहेर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
बिहारमध्ये जे नितीश कुमार यांना जमलं, ते उद्धव ठाकरेंना का जमलं नाही असं विचारलं असता आदित्य म्हणाले “२०१९ मध्ये आम्ही देशाला पर्याय दिला होता. दुर्दैवाने आमच्यातूनच काही विश्वासघात करणारे गद्दार बाहेर पडले, ज्यांनी एका प्रामाणिक व्यक्तीच्या पाठीत खंजीर खुपसला. सगळं काही देणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणं ही महाराष्ट्राची, देशाची संस्कृती नाही. हे घाणेरडं राजकारण असून आम्ही ते दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत”.
“ज्या निष्ठावंतांना स्थान दिलं आहे त्यांनाही कमी लेखलं आहे. आमच्याकडे बरे होते असं झालं आहे. तिथे जाऊन ते अडकले आहेत, नजरकैदेत आहेत. आता आमच्यासाठी दरवाजे खुले आहेत का असं त्यांना वाटत असेल. त्यांना मी सांगू इच्छितो, दरवाजे अद्यापही खुले आहेत. पण ज्यांना तिथे राहायचं असेल त्यांनी आमदाराकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावं,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.
दरम्यान विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणा देणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेदेखील सहभागी झाले होते. यावेळी आदित्य ठाकरेंनी आम्ही गद्दार सरकारचा विरोध करत असल्याचं म्हटलं. “ज्यांनी लोकशाहीचा खून केला त्यांच्याविरोधात आम्ही उभे असून, हे गद्दार सरकार असून कोसळणारच,” असा दावा आदित्य ठाकरेंनी केली. हे सरकार घटनाबाह्य, बेकायदेशीर आणि बेईमानांचं सरकार असून नक्की कोसळणार असंही ते म्हणाले.
“महाराष्ट्राच्या संस्कृतीत, राजकारणात याआधी गुंडगिरीची भाषा वापरली जात नव्हती. ज्या नव्या पक्षात ते जाऊ इच्छित आहेत, तिथे ही भाषा मान्य आहे का?,” अशी विचारणा यावेळी आदित्य ठाकरेंनी केली. “मुख्यमंत्री किंवा खरे मुख्यमंत्री यांचा अंकुश राहिला नसल्यानेच गुंडगिरीची भाषा वापरली जात आहे,” असं आदित्य म्हणाले.
मी काही राजीनामा मागणार नाही, पण जनता यांना याचं स्थान दाखवून देईल. ही गुंडांची भाषा असून, महाराष्ट्रात गुंडांना स्थान नाही अशी टीका यावेळी त्यांनी केली. जनतेला धमकावणारे आमदार असे उघडपणे फिरणार असतील, तर यापुढे राज्यात कायदा सुव्यवस्थेची काय अवस्था होईल याचा अंदाज येतो असंही ते म्हणाले.

Leave a Reply