राज्यमंत्रिमंडळात एकही महिलेला स्थान नाही, हे अत्यंत खेदजनक – सुप्रिया सुळे

मुंबई : ९ ऑगस्ट – शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केल्यानंतर ४० दिवसांनंतर राज्यमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे. राजभवनावरील शपथविधी सोहळ्याच्या पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र या पहिल्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तारामध्ये एकाही महिला मंत्र्याचा समावेश नाही. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत नाराजी व्यक्त केलीय.
आज राजभवानमध्ये पार पडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये एकूण १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांनी शपथ घेतली. तर भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांना नव्या मंत्रीमंडळात संधी देण्यात आली आहे. मात्र या यादीमध्ये शिंदे गट तसेच भाजपाकडूनही एकही महिला मंत्र्याचा समावेश करण्यात आलेला नाही. यावरुन सुप्रिया सुळेंनी ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केलीय.
स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ ‘होम मेकर’ असू नयेत तर त्या ‘नेशन बिल्डर’ असाव्यात असं ते सांगतात. पण राज्यात मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही,” असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी उघडपणे मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारामध्ये एकही महिला मंत्री नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केलीय. “मंत्रिमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक आहे. राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे,” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
सुप्रिया सुळेंशिवाय भाजपा महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही पूजा चव्हाण प्रकरणामधील वादग्रस्त शिवसेना आमदार संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Reply