अग्निपथ योजनेच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चा मैदानात

नवी दिल्ली : ७ ऑगस्ट – केंद्र सरकारनं भारतातील सैन्य भरतीसाठी अग्निपथ योजना सुरु केली आहे. अग्निपथ योजनेच्या माध्यमातून तरुणांना संरक्षण दलात चार वर्षांसाठी नोकरीची संधी मिळणार आहे. मात्र, या योजनेला विरोध होताना दिसत आहे. विरोधी पक्षांनी या योजने विरोधात आंदोलने केली होती. आता या योजनेच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चा मैदानात उतरणार आहे. आजपासून संयुक्त किसान मोर्चा आणि माजी सैनिकांच्या वतीनं अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ 7 ते 14 ऑगस्टपर्यंत आंदोलन करण्यात येणार आहे.
अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा आता मैदानात उतरणार आहे. तसेच त्यांच्याबरोबर माजी सैनिक देखील असणार आहेत. अग्निपथ योजना ही राष्ट्रीय सुरक्षा, भारतीय लष्कर, बेरोजगार तरुण आणि शेतकरी कुटुंबांसाठी विनाशकारी असल्याचे म्हटले आहे. अग्निपथ योजना मागे घेईपर्यंत आपला संघर्ष सुरुच राहणार असल्याचे मत संयुक्त किसान मोर्चा आणि माजी सैनिकांनी म्हटले आहे.
संयुक्त किसान मोर्चामध्ये अनेक शेतकरी संघटनांचा समावेश आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं केंद्र सरकारनं केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. दिल्लीच्या सिमेवर एक वर्ष हे आंदोलन सुरु होतं. अखेर शेतकऱ्यांपुढे सरकारला झुकावं लागलं आणि हे आंदोलन तब्बल वर्षभरानंत मागे घेण्यात आलं. हे यश संयुक्त किसान मोर्चाला द्यावं लागेल. तसेच, माजी सैनिकांच्या संयुक्त आघाडीने वन रँक वन पेन्शनसाठी सतत लढा दिला होता. आता अग्निपथ योजनेच्या विरोधात या दोन्ही आघाड्या मैदानात उतरल्या आहेत. या आंदोलनाच्या संदर्भात माहिती देण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं पत्रकार परिषदेत घेण्यात आली. यामध्ये त्यांनी ही सविस्तर माहिती दिली. 7 ते 14 ऑगस्ट या कालावधीत निवडक ठिकाणी जय जवान जय किसान संमेलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत देखील उपस्थित होते.

Leave a Reply