अकोल्यात मोबाईल टॉवरवर चढून प्रहारचे अनोखे आंदोलन

अकोला : ५ ऑगस्ट – महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि प्रहारचे नेते बच्चू कडू यांचं पालिकमंत्रिपदही गेलं. त्यानंतर आता प्रहारने पुन्हा एकदा हटके आंदोलन करण्यास सुरुवात केली असून याचीच झलक अकोल्यात पाहायला मिळाली. प्रहारचे महानगर उपाध्यक्ष गोविंद गिरी यांनी आज अनोखं आंदोलन केलं आहे. मंडळ अधिकारी आणि तलाठ्याने सांगळुद येथील शेतीचा चुकीच्या पद्धतीने फेरफार घेतल्याने त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी गोविंद गिरी यांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलं आहे.
अकोला शहरातील अकोट फैल भागातील मोबाईल टॉवरवर गोविंद गिरी यांचं हे आंदोलन सुरू आहे. आज दुपारी १ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरूच होतं. आंदोलनाच्या दरम्यान या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अकोट फैल पोलिसांनी आंदोलनाची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि नागरिकांना बाजूला केले.
अकोला तालुक्यातील सांगळुद येथील गट नं. २१९ बबन डोंगरे यांच्या मालकीचे शेत असून त्यांच्या शेतीची खरेदी काही दिवसांपूर्वी झाली. दरम्यान, ही खरेदी रद्द करण्यात यावी, यासाठी डोंगरे यांनी न्यायालय आणि उपविभागीय कार्यालयात धाव घेतली. न्यायालयात अन् उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात खटला सुरू असतानाही महादेव सरप या मंडळ अधिकाऱ्याने व तलाठी जायले यांनी चुकीच्या पद्धतीने फेरफार घेतल्यामुळे डोंगरे या शेतकऱ्याला मानसिक त्रास झाला आहे. अशाप्रकारे पदाचा दुरुपयोग करून तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी शेतीचा फेरफार घेतला असून त्यामुळे या दोघांवरही तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करत प्रहारच्या गोविंद गिरी यांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केलं आहे.
दरम्यान, नायब तहसीलदार किंवा तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात येईल, असा इशाराही गिरी यांनी दिला आहे.

Leave a Reply