महाराष्ट्रात तेढ निर्माण करण्याचा राज्यपालांचा कट – सुप्रिया सुळे

मुंबई : ३० जुलै – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावर विविध स्थरांवरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर सडकून टीका केली. महाराष्ट्रात तेढ निर्माण करण्याचा राज्यपालांचा कट असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तसेच त्यांना या पदावरून हटवण्याची मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
राज्यपाल हे एक घटनात्मक पद आहे. त्यांच्याबद्दल बोलणं गैर आहे. पण राज्यपाल सातत्यानं महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न त्यांच्याकडून होतो आहेत. विविधतेत एकात्मता ही भारताची ओळख आहे. मात्र, समाजामध्ये तेढ करण्याचे कटकारस्थान राज्यपाल सातत्याने करत आहेत. महाराष्ट्रात मीठाचा खडा टाकून कटुता वाढवायचा हा प्रकार आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहेत. तसेच संसदेत याविषयी आवाज उठवणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
राज्यापालांच्या वक्तव्यांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया द्यावी, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली. ”देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर मत व्यक्त करावं. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. यावर फडणवीसांनी उत्तर दिलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे राज्यपाल ज्या राज्यातून येतात, तिथे त्यांना परत पाठवलं पाहिजे कारण महाराष्ट्राबद्दल असलेला द्वेष राज्यपालांच्या वक्तव्यातून दिसतो, असेही त्या म्हणाल्या.

Leave a Reply