तुम्ही हे का बोलताय हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही – राज ठाकरेंचे राज्यपालांना पत्र

मुंबई : ३० जुलै – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देशाची आर्थिक राजधानी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. “मराठी माणसाला डिवचू नका” म्हणत राज ठाकरेंनी राज्यपालांना पत्र लिहलं आहे. ठाकरेंनी हे पत्र ट्वीट करत राज्यपालांना इशारा दिला आहे.
‘आपल्याला इतिहासाबद्दल माहिती नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे. त्यामुळे आपल्याबद्दल बोलताना लोक कचरतात. परंतु आपल्या वक्तव्याने जनतेच्या भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील जमीन आणि मन मशागत करुन ठेवल्यामुळेच इतर राज्यातील लोक इथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का?’, असा सवालही राज ठाकरेंनी राज्यपालांना विचारला आहे.
‘उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून वातावरण गढूळ करु नका. तुम्ही हे का बोलताय हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका इतकंच आपल्याता आत्ता सांगतो’. अशा आशयाचं पत्र राज ठारेंनी राज्यपालांना लिहिलं आहे.
राज्यपालांच्या मुंबईबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया आली आहे. शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी कोश्यारी यांचं हे वक्तव्य राज्याचा अपमान करणारं असून याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Leave a Reply