३ ऑगस्टपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल – अब्दुल सत्तार

नवी दिल्ली : २९ जुलै – राज्यामधील सत्तांतरणानंतर जवळजवळ एक महिना पूर्ण होत आल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. असं असतानाच आता शिवसेनेचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी थेट मंत्रीमंडळ विस्तार आणि मंत्र्यांच्या शपथविधीसंदर्भातील तारखेबद्दल भाष्य केलं आहे. मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीमध्ये ठाण मांडून असणाऱ्या सत्तार यांनी ३ ऑगस्टपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं म्हटलंय.
सत्तार यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये खातेवाटप आणि मंत्रीपदांसंदर्भातील वाटपाबद्दल अंतिम बोलणी पूर्ण झाल्याचा दावा केलाय. “कोणाला किती खाती मिळणार वगैरे ही वाटाघाटी झालेली आहे. मात्र अंतिम निर्णय झालेला नाही,” असं सत्तार यांनी म्हटलं आहे. “मंत्रीमंडळ विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची चर्चा झाली असून अंतिम यादीही तयार आहे. दिल्लीमधील वरिष्ठ नेते ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत त्यांनी विचारविनिमय केलेला आहे. त्यावर लवकरच अंतिम शिक्कामोर्तब होईल,” असं सत्तार म्हणालेत.
“असा माझा स्वत:चा अंदाज आहे की तीन तारखेपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. ३ तारखेच्या आत १०१ टक्के मंत्रिमंडळाचा विस्तर आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी होऊन जाईल,” असंही सत्तार यांनी वृत्तवाहिन्यांसोबत बोलताना स्पष्ट केलंय. मात्र सत्तार हे स्वत: मंत्रीपदासाठी इच्छू असून संभाव्य मंत्र्यांच्या यादीमधून त्यांचं नाव कापल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे.
मंत्र्यांच्या यादीमध्ये नाव कापल्याच्या चर्चेमुळेच अब्दुल सत्तार दिल्लीत पोहचल्याचं म्हटलं जात आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळेल की नाही याबद्दल बोलताना सत्ता यांनी, आम्हाला मंत्री करण्यात काही अडचणी येत असतील पण मी कोणतीही अट ठेवलील नाही, असं म्हटल्याचं वृत्त आहे.

Leave a Reply