उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांना प्रायव्हेट लिमिटेड करु नये – रवी राणा

अमरावती : २६ जुलै – एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. या बंडानंतर मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर भाजपशी हातमिळवणी करत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.
इतकंच नाही, तर आता शिवसेना खरी कोणाची?, धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार?, याचा फैसलाही निवडणूक आयोगापुढं होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत आज 26 आणि 27 जुलै रोजी प्रसिद्ध होत आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी या मुलाखतीवर जोरदार टीका केलीय. ते माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.
सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत म्हणजे फिक्सिंग मॅच असल्याचं त्यांनी म्हटलंय. राणा पुढं म्हणाले, मुलाखतीत संजय राऊत यांचेच प्रश्न असून उद्धव ठाकरेंनी उत्तर काय द्यायचं हे ही राऊतांनीच आधीच ठरवलेलं आहे. उद्धव ठाकरे हे संजय राऊतांची कटपुतली झाले आहेत. परंतु, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांना प्रायव्हेट लिमिटेड करु नये. कारण, शिंदे गटाचीच खरी शिवसेना आहे, अशी टीका त्यांनी राऊतांसह उद्धव ठाकरेंवर केलीय. उद्धव ठाकरेंचं उरलेलं अस्तित्वही संपवण्याची सुपारी संजय राऊत यांनी घेतली असल्याचा आरोपही रवी राणांनी केलाय.

Leave a Reply