वर्धा : २४ जुलै – वर्धा जिल्ह्यात संततधार पाऊस व धरणातील विसर्गामुळे रात्री अनेकांना रस्त्यावर येण्याची आपत्ती ओढवली. अनेक गावं जलमय झाल्याने शेकडो कुटुंबांचे स्थलांतर करावे लागले आहे. येळकेली पुलावरून पाणी वाहू लागल्याचे समजताच काठावर राहणाऱ्या गावकरी घाबरले. त्यामुळे त्यांनी रात्र रस्त्यावर जागून काढली.
खरंगना येथे धाम नदीची पातळी वाढल्याने धोकादायक ठरलेल्या घरे रिकामी करण्यात आली. गावकऱ्यांनी स्थलांतर केले, नांदपूर येथे बाकडी नदीच्या पुरामुळे तेरा कुटुंबांना स्थलांतरित करावे लागले. नदीच्या पुरात अडकलेल्या एका युवकास बचाव पथकाने सुरक्षित बाहेर काढले. वना नदीकाठच्या बरबडी, कांधली व अन्य गावांना सतर्क करण्यात आले आहे.
आज सकाळी आर्वी ते कौडण्यापूर हा मार्ग पुरामुळे बंद पडला असून शनिवारी रात्री बंद पडलेले मार्ग सध्या पाऊस नसल्याने खुले होण्याची शक्यता आहे.