मिस्टर फडणवीस, शिवसेनेचा लाऊडस्पीकर तुम्हाला बधिर केल्याशिवाय राहणार नाही – संजय राऊत

मुंबई : २४ जुलै – आमचा लाऊडस्पीकर हा जनतेचा बुलंद आवाज आहे. कोणाला कितीही पिपाण्या वाजवू द्या. शिवसेनेचा लाऊडस्पीकर 56 वर्ष झालं सुरु आहे. महाराष्ट्र आणि देश निष्ठेनं शिवसेनेच्या मागे उभा असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. मिस्टर फडणवीस, शिवसेनेचा लाऊडस्पीकर तुम्हाला बधिर केल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत राऊतांनी हल्लाबोल केला. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हे सरकार फार काळ टिकणार नाही. कारण हे सरकार मजबूत पायावर उभा नसल्याचे देखील राऊत यावेळी म्हणाले.
काल भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर देखील संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या पोटात जी मळमळ होती ती अखेर ओठावर आली. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या त्या भावना आहेत, त्याचा आदर व्हायला हवा असा टोला देखील राऊतांनी लगावला. दरम्यान भाजपमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. मनमोकळेपणानं तिथं बोलता येत नसल्याचे देखील राऊत यावेळी म्हणाले. सध्या आदित्य ठाकरेंचा बुलंद आवाज दिसत आहे. उद्धव ठाकरे हे देखील लवकरच राज्याचा दौरा करतील. प्रत्येक शिवसैनिकांचा आक्रोश बाहेर येत आहे. हा लाऊडस्पीकर तुम्हाला बधिर केल्याशिवाय नाही, असे म्हणज राऊतांनी भाजपवर निशाणा साधला. शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी सुद्धा हे सरकार टिकाणार नाही असं सांगितल्याचे राऊत म्हणाले.
काल जे आम्ही पैठणचे चित्र पाहिले, ते पाहून पैठणची नाथसागरच रस्त्यावर उसळत होता. तो माणसांच्या रुपात होता. हे चित्र ज्यांनी महाराष्ट्रात चोऱ्या माऱ्या केल्या. ज्यांनी सरकार स्थापन केलं त्यांच्या छातीत धडकी भरवणारं असल्याचे राऊत म्हणाले. काल अनेकांच्या डोळ्यातून अश्रू आले. त्या अश्रूंच्या महापुरातच हे डबल स्टँडचं सरकार वाहून गेल्याशिवाय राहणार नाही. आम्ही भाजपसारख्या तारखा देणार नाही. हे सरकार 11 दिवसात पडेल, 15 दिवसात पडेल असे आम्ही म्हणणार नसल्याचे राऊत म्हणाले. त्यांच्या पिपाण्या वाजत होत्या. पण हे सरकार राहणार नाही.
हम दोनो एक दुजे के लिए
भाडोत्री भोंगे आणि लाऊडस्पीकर यामध्ये फरक आहे. शिवसेनेचा लाऊडस्पीकर 56 वर्ष झालं सुरु आहे. या लाऊडस्पीकरवरची गर्जना ऐकण्यासाठी 56 वर्ष झालं देश आणि महाराष्ट्र शिवसेनेच्या मागे उभा असल्याचं राऊतांनी सांगितलं. तुम्ही आधी सरकार स्थापन करा आणि मग बोला. एक महिन्यानंतर देखील ‘हम दोनो एक दुजे के लिए’ सुरु असल्याचं राऊत म्हणाले. किती वेळा दिल्लीला जाल? असा सवालही राऊतांनी केला. जरी भाजपचे लोक म्हणत असतील आम्ही शिवसेनेबरोबर आहोत, तर ते शिवसेनेबरोबर नाहीत असे राऊत म्हणाले. शिवसेना काय आहे ते तुम्हाला संभाजीनगरला दिसली. पैठणला दिसली असं राऊतांनी सांगितलं. शिवसेना स्वाभिमानी आहे, कष्टकऱ्यांची, श्रमिकांची असल्याचे राऊत म्हणाले.

Leave a Reply