६४ टक्के मते मिळवत द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतिपदी विराजमान

नवी दिल्ली : २२ जुलै – राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) द्रौपदी मुर्मू यांनी ६,७६,८०३ इतके मतमूल्य मिळवून विजय मिळवला़ विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या पारडय़ात केवळ ३,८०,१७७ इतके मतमूल्य जमा झाल़े
मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीतच मुर्मू यांनी विजयासाठी आवश्यक मतांचा जादुई आकडा गाठला़ मुर्मू यांना ६४़ ०३ टक्के, तर सिन्हा यांना ३६ टक्के मते मिळाली़ द्रौपदी मुर्मू या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती बनणार असून, त्या पहिल्या आदिवासी-महिला राष्ट्रपती ठरतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत असून, २५ जुलै रोजी द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील.
पहिल्या फेरीमध्ये खासदारांची मते मोजण्यात आली. मतदान करणाऱ्या ७४८ (५ लाख २६ हजार ६०० मतमूल्य) खासदारांपैकी ५४० मते (३ लाख ७८ हजार मतमूल्य) मुर्मूना मिळाली तर, २०८ मते (१ लाख ४५ हजार ६०० मतमूल्य) यशवंत सिन्हा यांच्या पारडय़ात पडली. १५ मते अवैध ठरली. त्यामुळे पहिल्याच फेरीमध्ये द्रौपदी मुर्मू यांना मोठे मताधिक्य मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पहिल्या फेरीनंतर दिल्लीमध्ये जल्लोष सुरू झाला. लोककलाकारांनी आदिवासी नृत्यावर ताल धरला, त्यामध्ये केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधानही सामील झाले.
संसदभवनात तसेच, राज्या-राज्यांच्या विधानसभेमध्ये १८ जुलै रोजी ९९ टक्के मतदान झाले होते. ७७१ खासदार व ४ हजार २५ आमदार मिळून ४ हजार ७९६ सदस्य मतदानासाठी पात्र होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर राज्या-राज्यांमधील मतपेटय़ा संसद भवनात आणल्या गेल्या होत्या. संसद भवनातील विशेष कक्षामध्ये सकाळी अकरा वाजल्यानंतर सर्व मतपेटय़ा उघडण्यात आल्या व दुपारी एक वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. सर्वप्रथम खासदारांची मते मोजण्यात आली. दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची मतमोजणी पूर्ण झाली तेव्हा मुर्मू यांना ५३ टक्के मिळाली होती़
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील एकूण १० लाख ८६ हजार ४३१ मतमूल्यांपैकी विजयी होण्यासाठी किमान ५ लाख ४३ हजार २१६ मतमूल्यांची गरज असते. ‘एनडीए’कडे ५ लाख ६३ हजार ८२५ म्हणजेच ५२ टक्के मतमूल्य होते. पण, मुर्मूची उमेदवारी घोषित झाल्यानंतर विरोधकांमध्ये फूट पडली. विरोधकांपैकी झारखंड मुक्ती मोर्चा, शिवसेना यांनीही मुर्मूना पाठिंबा दिला. याशिवाय, ‘एनडीए’मध्ये नसलेले वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल यांनीही मुर्मूना मत दिल्याने त्यांचा विजय एकतर्फी झाला.
मुर्मू यांच्या विजय भाजपसाठी मोठा राजकीय लाभ मिळवून देईल, असे मानले जात आहे. वर्षांअखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होत असून पुढील वर्षी मध्य प्रदेश, राजस्थानमध्येही निवडणुका होणार आहे. शिवाय,
मुर्मूच्या विजयामुळे झारखंड, छत्तीसगड, ओदिशा, महाराष्ट्र या राज्यांमधील आदिवासी मतदारसंघांमध्ये भाजपला पकड मिळवता येईल असाही अंदाज बांधला जात आहे. दोन वर्षांनंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उत्तरेकडील राज्यांमधील आदिवासी मतांचा भाजपला फायदा होऊ शकेल, असेही मानले जात आहे.
द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओदिशातील मयूरभंज येथे झाला. त्यांचे वडील, बिरांची नारायण तुडू हे बाईदापोसी गावातील अल्पभूधारक शेतकरी. अत्यंत गरिबीतही त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. त्या रायरंगपूरमध्ये ‘अरिबदो इंटिग्रल एज्युकेशन अँड रिसर्च’ या संस्थेत प्राध्यापक झाल्या. त्यानंतर त्यांची ओदिशाच्या पाटबंधारे विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणून नियुक्ती झाली. मुर्मूचा राजकीय प्रवास १९९७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरू झाला. त्याच वर्षी, त्या रायरंगपूरमधील आदिवासी राखीव प्रभागातून नगरसेविका झाल्या. त्या भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या उपाध्यक्ष होत्या. २००० व २००९ मध्ये मुर्मूनी रायरंगपूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. ओदिशामध्ये भाजपच्या पाठिंब्याने सत्तेवर आलेल्या बिजू जनता दलाच्या सरकारमध्ये त्या परिवहन आणि वाणिज्य मंत्री झाल्या. २००२ मध्ये मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्रालयाचा कारभार सांभाळला. त्याच वर्षी त्या मयूरभंज भाजप जिल्हाध्यक्ष बनल्या. २०१३ मध्ये मुर्मूना तिसऱ्यांदा जिल्हाध्यक्षपद देण्यात आले. २०१५मध्ये मुर्मू यांना झारखंडचे राज्यपाल झाल्या, त्या झारखंडच्या पहिल्या आदिवासी राज्यपाल होत्या.

Leave a Reply