मुलींच्या शिक्षणासाठी जेलमधून फरार झालेल्या बापाने मुलींच्या भविष्यासाठी केले आत्मसमर्पण

नागपूर : २२ जुलै – आई-वडील मुलांसाठी अनेक त्याग आणि कष्ट करतात. मुलांनी यश मिळवल्यानंतर अनेक पालकांच्या त्यागाच्या स्टोरी तुम्ही वाचल्या आणि पाहिल्या असतील. पण आता जी स्टोरी तुम्ही वाचणार आहात तशी स्टोरी याआधी कधीच ऐकली नसेल.
हत्येप्रकरणी एका व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. शिक्षेचा कालावाधी सुरू असताना तो परोलवर बाहेर आला आणि १२ वर्ष फरार राहिला. त्यानंतर अचानक त्याने आत्मसमर्पण केले. हे सर्व कशासाठी तर मुलीच्या शिक्षणासाठी..
संजय तेजने यांना २००३ साली वडील शालीराम आणि भाऊ वासुदेव, नामदेवसह हत्येच्या आरोपात अटक करण्यात आले होते. या चौघांना २००५ साली जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. संजय दोन वेळा पत्नी कल्पना आणि आईला भेटण्यासाठी परोलवर बाहेर आले होते. पहिल्यांदा ते जेव्हा तुरुंगातून बाहेर आले तेव्हा त्याची पत्नी गर्भवती झाली.
पत्नी कल्पनाने २००७ साली जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर त्यांनी न्यायालयाकडे शिक्षा माफ करण्यासाठी अर्ज केला. पण उच्च न्यायालयाने तो फेटाळून लावला. त्यानंतर संजय यांनी परोलसाठी अर्ज करण्याचे ठरवले आणि दोन्ही मुली मोठ्या होईपर्यंत फरार होण्याचा निर्णय घेतला. ठरवल्यानुसार संजय यांनी प्लॅन केला आणि तब्बल ४ हजार २०० दिवस फरार राहिले.
फरार झालेल्या काळात संजय यांना काहीही करता आले असते पण त्यांच्यासाठी मुलींच्या पेक्षा काहीही महत्त्वाचे नव्हते. मुलींसाठी त्यांनी फरार होण्याचा निर्णय घेतला आणि तिचे शिक्षण पूर्ण होताच आत्मसमर्पण देखील केले. संजय यांच्या मुली श्रद्धा आणि श्रुती १२ मे रोजी जाहिर झालेल्या दहावीच्या निकालात अनुक्रमे ८६ आणि ८३ टक्के गुण मिळवले. त्यानंतर मुलींचे भविष्य खराब होऊ नये म्हणून त्यांनी आत्मसमर्पण केले.
या १२ वर्षात संजय भलेही तुरुंगाच्या बाहेर असले तरी त्याचे आयुष्य तुरुंगापेक्षा वेगळे नव्हते. या काळात ते एका प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरीला लागले आणि मुलींना लपून भेटत. पकडले जाऊ नये म्हणून ते फोनवर देखील बोलत नव्हते. कुठे बाहेर फिरण्यास जात नसत ना घरातून बाहेर पडत. त्याचा उद्देश एकच होता की काही करून मुलींचे शिक्षण पूर्ण व्हावे.
संजय यांच्या मुली आता १६ वर्षाच्या झाल्या आहेत. गुरुवारी नागपूर मध्यवर्ती तुरुंगात एका NGO आणि तुरुंग विभागाने दोघींचे कौतुक केले. त्या दोघींनी नागपूरमधील हुडकेश्वर खुर्द चिकना संताजी शाळेतून शिक्षण घेतले.
वडिलांच्या भेटीबद्दल बोलताना श्रद्धाने सांगितले की, आम्ही गुपचूप भेटायचो. ते माझ्यासाठी पुस्तक आणत. परीक्षेच्या काळात ते रोज केंद्रावर सोबत येत. त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली. मला इंजिनिअरिंग करायचे आहे. त्यानंतर मला वडिलांचे IAS अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. पण आता सर्व काही माझ्या आईच्या हातात आहे.
श्रृती म्हणाली, वडील आमच्यापासून दूर होते. पण आम्हाला कधीच असुरक्षित वाटले नाही. आम्ही शिक्षकांचे आभार व्यक्त करतो. यापुढे आमच्या आयुष्यात मोठी आव्हान असतील. आतापर्यंत वडिलांनी शिक्षणाचा खर्च केला, आता ही जबाबदारी आईवर आली आहे.

Leave a Reply