सुधीर मुनगंटीवारांनी शिंदे सरकारच्या या वेगवान निर्णयांची तुलना केली नायक चित्रपटाशी

चंद्रपूर : १९ जुलै – राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार ज्या वेगाने निर्णय घेत आहे ते पाहता नायक चित्रपटामधील प्रमुख व्यक्तीरेखेशी तुलना केली जात असल्याचं मत भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना गडचिरोली दौऱ्याचा संदर्भ देत मुनगंटीवार यांनी अभिनेता अनिल कपूरची मुख्य भूमिका असणाऱ्या नायक चित्रपटाचा उल्लेख केलाय. या चित्रपटामध्ये एका दिवसासाठी मुख्यमंत्री झालेला शिवाजीराव गायकवाड (अनिल कपूर) वेगाने निर्णय घेत लोकांच्या हिताची कामं करताना दाखवण्यात आलंय.
“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी सध्याच्या सरकारची स्थिती ही अतिदक्षता विभागातील रुग्णाप्रमाणे असल्याने ते मंत्रिमंडळाचा विस्तार करत नाहीत अशी टीका केलीय. तसेच पालकमंत्री नसल्याने लोकांचे अश्रू पुसायला कोणी नाहीय. तसेच नाताबरोबर वेळ घालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे चार तास आहेत तर शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला त्यांच्याकडे वेळ नाही”, असा संदर्भ देत पत्रकारांनी मुनगंटीवार यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना मुनगंटीवार यांनी, “महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा असणाऱ्या गडचिरोलीचा दौरा पहिलाच दौरा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. आपला हा पहिलाच दौरा या नेत्यांनी पूर परिस्थितीची पाहाणी करण्यासाठी केला. त्यांनी तातडीने निर्णय घेतले,” असं सांगितलं.
पुढे बोलताना मुनगंटीवार यांनी शिंदे सरकारच्या या वेगवान निर्णयांची तुलना थेट नायक चित्रपटाशी केली. “हे निर्णय पाहिल्यानंतर या महाराष्ट्रातून एकच आवाज येत होता की, नायक चित्रपटामधील नायक जसा निर्णय करतो तसे वेगाने निर्णय होत आहेत,” असं मुनगंटीवार म्हणाले. खडसेंवर टीका करताना त्यांनी, “आता या निर्णयांनंतर सुद्धा टीका होता आहे. काही लोकांचं समाधान आयुष्यभर होऊ शकत नाही. या सरकारवर टीका केल्यानंतरच आपलं पद हे जास्त स्थीर होऊ शकतं आणि आपल्याला नेते म्हणून मान्यता मिळू शकते ही भावना त्यांच्या मनात असावी. सरकार वेगाने काम करत आहे,” असं म्हटलं.
“नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याचा निर्णय मागच्या सरकारमध्ये ६ मार्च २०२०, ८ मार्च २०२१ आणि ११ मार्च २०२२ ला पुन्हा तीच कॅसेट वाजवण्यात आली. जुनी रेकॉर्ड जशी अडकायची तसा प्रकार होता. या सरकारने निर्णय केला. त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले. म्हणून मला असं वाटतं लोकांचे अश्रू पुसण्यामध्ये हा पुढाकार शिवसेना-भाजपाचं सरकार घेईल,” असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
या मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात कौटुंबिक घटनेच्या आधारे भाष्य करणं हे राजकीय दृष्टीकोनातून परंपरेच्या विरुद्ध आहे. एखाद्या आईने मुलासाठी स्वयंपाक केला ही बातमी होत नाही. मुख्यमंत्री मंत्रालयात गेले ही बातमी होता कामा नये. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी रंजल्या गांजल्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी मुख्यमंत्री हे पद स्वीकारतात. मात्र दुर्देवाने या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री मंत्रालयाशी जसं काही त्यांचं शत्रुत्व असावं अशापद्धतीने ते मंत्रालयात गेले नाहीत. त्याबद्दल शब्द नाही. नातवाला घेऊन कुठं कौटुंबिक जबाबदारी पार पाडली तर त्यावर टीका करायची हे राजकीय प्रथा परंपरेला शोभत नाही,” असा टोला त्यांनी खडसेंना लगावला.

Leave a Reply