नाल्यात पाय धुतांना नाल्यातच बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

यवतमाळ : १८ जुलै – यवतमाळ शहरासह जिल्ह्यात सतत 24 तासांपासून मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले तुडुंब भरले आहेत. दरम्यान, यवतमाळ शहरातील नाल्यावर शाळेकरी मुलगा पाय धुण्याकरिता गेला होता. तेथेच पाय धुत असताना, पाय घसरून तो नाल्यात पडला. नाल्यातील पाण्याच्या प्रवाहात बुडून त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
शहरातील राधाकृष्णनगर, जांब रोड परिसरामध्ये इयत्ता सातवीतील विद्यार्थी नाल्यातील पाण्यात पडल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना आज दिनांक १८ जुलै सकाळी ९ वाजताच्या सुमारास रोजी घडली. जय शंकर गायकवाड (वय १२ वर्ष रा. राधाकृष्णनगर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो लहान वडगावमधील देवराव भाऊराव पाटील या शाळेमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत होता. आज तो सकाळी शाळेत गेला होता. मात्र, शाळेत पोहोचल्यानंतर विद्यार्थी कमी असल्याच्या कारणाने तो घराकडे परतला. त्याचे पाय चिखलाने भरल्यामुळे तो घराजवळच्या नाल्याजवळ पाय धुण्याकरिता गेला. पाय धुत असताना त्याचा पाय घसल्याने तो नाल्यात पडला.
जय गायकवाड हा शाळकरी लहान विद्यार्थी पाय धुताना घराशेजारील नाल्यात पडला. त्याला पोहता येत नसल्याने एवढ्या पाण्याच्या प्रवाहात तो वाहत गेला. पाण्याच्या प्रवाहातच बुडून त्याचा दुर्दैवी अंत झाला.

Leave a Reply