गडचिरोलीत पुरामुळे हाहाकार, १०० गावे संपर्काबाहेर, १२ गावांत शिरले पुराचे पाणी

गडचिरोली : १५ जुलै – पाच दिवसांपासून दमदार बरसणाऱ्या पावसामुळे विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यातच तेलंगणमधील धरणांचे पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आल्याने दक्षिण गडचिरोलीत हाहाकार उडाला आहे. सिरोंचाचा चारही बाजूने संपर्क तुटल्याने वायूदलाच्या हेलिकॉप्टरसाठी प्रयत्न केले जात आहेत. भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली आल्याने शंभरांवर गावे दोन दिवसांपासून संपर्कात नाहीत. आष्टीच्या पुलावर पाणी असल्याने चंद्रपूर मार्गावरील वाहतूक थांबली आहे. गोसेखुर्द, निम्न वर्धा, अप्पर वर्धा व इरई धरणाचे दरवाजे उघडल्याने नद्यांचा जलस्तर वाढून काठावरील गावांना धोका निर्माण झाला आहे.
मेडीगट्टा-कालेश्वर प्रकल्पातून २३ लाख क्युसेक्स पाणी सोडले जात असल्याने गोदावरी नदीचा जलस्तर वाढला आहे. गोसेखुर्द प्रकल्पाचे ३३ दरवाजे उघडण्यात आल्याने प्राणहिता नदी फुगली आहे. यातच पावसाचा जोर कायम असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील नगरम, चिंतलपल्ली, अरडा, मध्धीकुंटा, मुगापूर, सूर्यारावरपल्ली, कोत्तापली, नरिपुडा, अंकिसा, कोटामाल, सोमनूर, सोमनपल्ली, सिरोंचासह १२ गावांत पुराचे पाणी शिरले आहे. सिरोंचावरून प्राणहितेच्या पुलावरून तेलंगणकडे जाताना एक किलोमीटरवरील रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने चेन्नूर मार्ग बंद पडला आहे. सिरोंचा-आलापल्ली हा मार्ग पूर्णत: बंद आहे. सिरोंचावरून कालेश्वर मार्गे वारंगल, करीमनगर, हैदराबादला जाणारा राष्ट्रीय महामार्गसुद्ध गोदावरीच्या पुरामुळे ठप्प पडला आहे. १९८६च्या सुमारास आलेल्या महापुराच्या आठवणी यानिमित्ताने ताज्या झाल्या आहेत.
भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. या पाण्यामुळे दक्षिण गडचिरोलीतील सिरोंचा, अहेरी, चामोर्शी तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण गडचिरोलीला जोडणारा वैनगंगा नदीवरील आष्टीचा पूल पाण्याखाली आल्याने अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, मुलचेरा या पाच तालुक्यांचा संपर्क तुटला आहे.
सिरोंचाचे तहसीलदार जितेंद्र सिकतोडे हे बुधवारी पाण्याने वेढलेल्या सोमनूरमध्ये गेले होते. गावातून तीन गर्भवती महिला आणि चार वृद्धांना सुरक्षित बाहेर काढले. नंतर आसरअल्ली-अंकिसा मार्ग बंद पडल्याने सिकतोडे अडकले. दोनदा वाहून जातानाही बचावले. सिरोंचाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास शिंदे हे रात्रीपासून गोदावरी काठच्या काही गावांमध्ये फिरत होते. गावकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत होते. पण, काही गावकऱ्यांनी पाणी जवळ आल्याशिवाय घर सोडणार नसल्याचे ठणकावले. या गावकऱ्यांची समजूत काढण्यासाठी, माहिती देण्यासाठी रात्री तेुलुगू भाषेतूनही दवंडी देण्यात आली.
जिल्हाधिकारी संजय मीना, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी क्रिष्णा रेड्डी हे पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांपासून माहिती घेत आहेत. पूरग्रस्त सिरोंचाला आवश्यक सर्व मदत पुरविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. सतत पाऊस सुरू असल्याने वायूदलाच्या हेलिकॉप्टरची मदत घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

Leave a Reply