शिवसेनेने बहुमताचा आदर करून सर्व केसेस तसेच याचिका मागे घ्याव्या – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : ११ जुलै – शिवसेच्या १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेविषयीच्या याचिकेवर आज सुनावणी होऊ शकली नाही. मात्र जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय या प्रकरणातील सर्व याचिकांवर सुनावणी घेत नाही, तोपर्यंत आमदारांवर कारवाई करु नये, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना केली आहे. न्यायालयाच्या या सूचनेनंतर भाजपाचे नेते तथा माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेने बहुमताचा आदर करावा, जर्व केसेस तसेच याचिका मागे घ्याव्यात, असे आवाहन बावनकुळे यांनी केले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
शिवसेनेची ही परिस्थिती केविलवाणी आहे. ज्या दिवशी अध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये आणि विश्वासदर्शक ठरावात १६४ मतं मिळाली; त्याच दिवशी शिवसेनेने सर्व याचिका मागे घ्यायला हव्या होत्या. १६४ डोकी मोजली गेली. इतकं मोठे बहुमत त्यांना मिळालं आहे. चिडून ते केसेस करत आहेत. मला वाटत की, १६४ डोकी मोजली गेली हे सुप्रीम कोर्टाला कोर्टालाही समजलं आहे. माझी शिवसेनेला विनंती आहे, की सर्व याचिका मागे घ्याव्या आणि जनादेशाचा आदर करावा,” असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांच्या निलंबनाची मागणी करणाऱ्या याचिकेवर पूर्ण सुनावणी होईपर्यंत कोणताही कारवाई करु नये, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या माध्यमातून विधानसभा अध्यक्षांना दिली आहे. तसेच या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी घटनापीठाची स्थापना करणे आवश्यक आहे; त्यामुळे होणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
शिवसेनेची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर आज ठरलेल्या तारखेला म्हणजेच ११ जुलै रोजी प्रकरण सुनावणीसाठी घ्यावे, अशी विनंती केली होती. मात्र ही विनंती सर्वोच्च न्यायालयाने नाकारली आहे. पुढील सुनावणी नेमकी कधी होणार याबाबत न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेले नाही.

Leave a Reply