आशिष जयस्वालांच्या मंत्रिपदाला भाजपमधून विरोध

नागपूर : १० जुलै – रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल हे भ्रष्टाचारी असून खनिज महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी वाळू विक्रीत १५० कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. भाजपची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी अशा भ्रष्टाचारी नेत्याला मंत्रीपद देऊ नका, अशी मागणी भाजपच्या ग्रामविकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष व रामटेक विधानसभा क्षेत्राचे प्रभारी डॉ. राजेश ठाकरे यांनी शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत केली. विशेष म्हणजे, शिंदे गटात सामील होऊन भाजपची आश्रयछाया मिळवणाऱ्या जयस्वाल यांच्या विरुद्ध भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याने इतके गंभीर आरोप केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
डॉ. ठाकरे म्हणाले, “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे आ. जयस्वाल यांनी केलेल्या भ्रष्टाराची सर्व कागदपत्रे पुराव्यासह पाठविणार आहे. त्यांना पत्र लिहून आ. जयस्वाल यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद देऊ नये, अशी मागणी करणार आहे”.
“आ. जयस्वाल यांचा रामटेक तालुक्यातील खनिज संपत्तीवर डोळा आहे. खनिज महामंडळाचे अध्यक्ष असताना तब्बल १५० कोटींचा गैरव्यवहार व खनिज विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन सत्तेचा दुरुपयोग केला. खिंडसी ते वैनगंगा-सूर नदीतील रेती उपसता यावी, यासाठी जयस्वाल यांनी गरिबांच्या घरासाठी मातीमिश्रीत वाळूच्या नावावर परवानगी मिळवली होती. त्या माध्यमातून वाळू तस्करी केली. यापूर्वीसुद्धा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आ. जयस्वालांवर ३०० कोटींचा गैरव्यवहाराचा आरोप करून चौकशीची मागणी केली होती. त्यावरून चौकशीस सुरवातही झाली होती. परंतु, तत्कालिन मुख्यमंत्री ठाकरे यांनी ती चौकशी बंद केल्याचा आरोपही,” यावेळी डॉ. ठाकरे यांनी केला.
शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यासाठी जयस्वाल यांच्या मर्जीतील लोकांनी धान खरेदी केंद्र उघडून राज्यातील नव्हे तर मध्यप्रदेश, छत्तीसगढ राज्यातील शेतकऱ्यांकडून आयात केलेले धान्य खरेदी केले. त्यातही कोट्यवधींचा भ्रष्टाचार जयस्वाल यांनी केला. एका शेतकऱ्यांचे धानविक्रीचे १४ लाख ५२ हजार रुपये जयस्वाल यांनी हडपल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.
लोहकरे, साठवणे हत्याकांडाशी संबंध
मॅक्सवर्थ कंपनीशी साटेलोटे करून जयस्वाल यांनी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नातेवाईक आणि निकटवर्तीयांच्या नावावर कमी किमतीत खरेदी करून जास्त किमतीत विकल्या. ५० पेक्षा जास्त कंपन्या आ. जयस्वाल यांनी नातेवाईकांच्या नावावर स्थापन केल्या आहेत. लोहकरे हत्याकांड आणि साठवणे हत्याकांडाचेही धागेदोरे आ. जयस्वाल यांच्याशी जुळत असल्याचा आरोप या पत्रपरिषदेत करण्यात आला.
आ. जयस्वाल यांनी कोट्यवधीचा गैरव्यवहार केला आहे. त्यांनी कोट्यवधीची जमीन विकत घेतली आहे. त्यांनी नातेवाईकांच्या नावाने संपत्ती घेतली आहे. त्यामुळे जयस्वाल यांची ईडी चौकशी करण्यात यावी. तसेच सीबीआयनेही चौकशी करावी, अशी मागणीही ठाकरे यांनी केली.

Leave a Reply