अमरावती : ८ जुलै – मेळघाटात चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या चुरणी काटकोन पाठ डोंगरी या गावांमध्ये ग्रामस्थांनी विहिरीचे दूषित पाणी पिल्यामुळे विषबाधा होऊन एकूण दोन जण दगावले आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी रोष व्यक्त केला आहे. चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये आदिवासी बांधवांनी वीज देयक भरले नसल्यामुळे त्यांच्या गावातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. गावात वीज पुरवठा नसल्यामुळे शुद्ध पाणी देखील ग्रामस्थांना मिळणे बंद झाले आहे. तहान भागवण्यासाठी ग्रामस्थांना विहिरीच्या अशुद्ध पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. अशुद्ध पाणी पिल्यामुळे या तीनही गावात अनेक जण आजारी पडले आहे. तर, दोन जणांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. यावर अमरावतीच्या खासदार नवनित राणा यांनी दु:ख व्यक्त केले असून ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.
दूषित पाणी पिल्यामुळे या तिन्ही गावातील एकूण 50 जणांना विषबाधा झाली असून यापैकी 20 जण अति गंभीर आहे. या 20 ही जणांवर चूर्ण येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून अमरावती वरून वैद्यकीय पथक या ठिकाणी पाठवण्यात आले असल्याचे खासदार नवनीत राणा म्हणाल्या. 30 जणांवर काट कुंभ आणि पचडोंगरी या गावात उपचार सुरू आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याबाबत खासदार नवनीत राणा यांनी निर्देश दिले आहेत.