मुंबईत गेल्यानंतर पुढील रणनीती ठरवणार – गटनेतेपदी निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

पणजी : ३० जून – शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून निवड केली आहे. एकनाथ शिंदे यांनीच गोवा विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे मुंबईसाठी रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे मुंबईत येऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. याआधी गोवा विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याचा आपल्याला आनंद नाही असंही सांगितलं.
गोव्यात बंडखोर आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीसंबंधी विचारलं असता एकनाथ शिंदे यांनी बैठकीत शिवसेना पक्षाचा गटनेता म्हणून माझी निवड झाली असल्याचं सांगितलं. “सरकार स्थापनेसंदर्भातील पुढील प्रक्रियेसाठी सर्व ५० आमदारांनी मला अधिकार दिले आहेत. मुंबईत गेल्यानंतर पुढील रणनीती ठरवणार आहे. मी परत गोव्याला येणार आहे,” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “त्याचा आम्हाला आनंद नाही. जी परिस्थिती उद्भवली होती त्यात सर्व ५० आमदारांची एकच मागणी होती. आमदारांना मतदारसंघात काही प्रश्न, अडचणी होत्या. वाईट अनुभव येत होते. तेव्हा आपण बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाऊयात अशी सर्व ५० आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी होती. वेळीच निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती. आम्हाला कोणालाही आनंद नाही. उद्धव ठाकरेंबद्दल आमच्या मनात कालही आदर होता आणि आजही आहे”.
दरम्यान याआधी शिंदे गटासोबत भाजपाची चर्चा सुरु असल्याच्या बातम्या समोर येत असतानाच अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन शिंदेंनी ट्वीट करत केलं होतं.
“वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस,” असं ट्विट शिंदेंनी केलं होतं. त्यानंतर पुढच्याच मिनिटाला त्यांनी, “भाजपासोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका,” असंही आवाहन आपल्या समर्थकांना केलं.

Leave a Reply