पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन करावे – अधिक गहलोत

जयपूर : २९ जून – प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या शिवणकाम व्यावसायिकाची राजसथामधील उदयपूर येथे हत्या करण्यात आली. या हत्येनंतर देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. त्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ही घटना खूप गंभीर असून सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी जनतेला संबोधित करुन शांतता राखण्याचे आवाहन करावे, असे गहलोत म्हणाले आहेत.
“ही लज्जास्पद आणि दुखद घटना आहे. सध्या येथे तणावाचे वातावरण आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह देशाला संबोधित का करत नाहीयेत. मोदी यांनी देशाला संबोधित करावं आणि अशा प्रकारच्या हिंसेला खपवून घेतले जाणार नाही. सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन करावे,” अशी मागणी गेहलोत यांनी मोदी आणि अमित शाह यांना केली.
तसेच, “ही घटना खूपच गंभीर आहे. आमच्या कल्पनेच्या पलीकडीची ही घटना आहे. या घटनेतील गुन्हेगारास कठोर शिक्षा दिली जाईल,” असे आश्वासन गेहलोत यांनी जनतेला दिले.
दरम्यान, या घटनेचे पडसाद उमटत असताना काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. “उदयपूरमध्ये जी निर्घृण हत्या झाली त्यामुळे मला धक्का बसला आहे. धर्माच्या नावावर सुरु असलेली क्रूरता खपवून घेतली जाणार नाही. दहशत पसरविणाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. आपल्या सर्वांना सोबत येऊन द्वेषाचा पराभव करायचा आहे. सर्वांनी शांतता आणि बंधुभाव राखावा, असे माझे आवाहन आहे,” असे राहुल गांधी म्हणाले आहेत.
राजस्थानमधील उदयपूर येथे एका शिवणकाम व्यावसायिकाची मंगळावारी (२८ जून) हत्या करण्यात आली. त्याच्या दुकानात घुसून हल्लेखोरांनी त्याच्यावर तलवारीने वार केले आणि या हल्ल्याची चित्रफीत बनवून समाजमाध्यमांवर प्रसारित केली. त्यामुळे उदयपूरमध्ये तणाव निर्माण झाला असून या हत्येच्या निषेधार्थ स्थानिकांनी आंदोलन केले जात आहे. कन्हैयालाल तेली असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांचे उदयपूरमधील धनमंडी येथे कपडे शिवण्याचे दुकान आहे.

Leave a Reply