राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील कोणतातरी एक संजय जाणार – अनिल बोंडे

मुंबई : १० जून – मागील काही दिवसांपासून राज्यात राज्यसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरु आहे. आज या निवडणुका पार पडत असून काही तासात निकाल समोर येणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून दावे प्रतिदावे सुरु असून आता कोण कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अनेक राजकीय घडामोडींनंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर आरोपप्रत्यारोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाचे उमेदवार अनिल बोंडे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.
राज्यसभेच्या तीनही जागा आम्ही जिंकू. आम्हाला आत्मविश्वास आहे. आमच्या मनात या जागेबाबत अजिबात धाकधूक नाही. महाभारतात ज्याप्रमाणे अश्वत्थामा गेला त्याप्रमाणे या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील कोणतातरी एक संजय जाणार, असं वक्तव्य भाजपाचे अनिल बोंडें यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये प्रतिष्ठेची आणि अतितटीची निवडणूक म्हणून पाहिली जातं आहे. आम्हीच जिंकू असा दावा दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. मात्र भाजप उमेदवार अनिल बोंडे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, आघाडीचे उमेदवार संजय पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. एक संजय बाहेर जाणार असं सूचक विधान त्यांनी केलं आहे.
पुढे ते म्हणाले की, कोणता अश्वत्थामा गेला होता, हेही धर्मराजाने सांगितले नव्हते. त्यामुळे कोणता संजय जाणार हे मी सांगणार नाही, ते नंतर कळेल. पण, महाविकास आघाडीतील एक कोणता तरी संजय जाणार नक्की. सायंकाळपर्यंत कोणता ते कळेल, असेही बोंडे म्हणाले आहेत.

Leave a Reply