पाणी भरण्याच्या वादातून पती-पत्नीने केला आत्महत्येचा प्रयत्न, पत्नीचा मृत्यू पति गंभीर

नागपूर : १० जून – पाणी भरण्याच्या वादातून एका दाम्पत्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला तर पती रुग्णालयात मृत्यूशी संघर्ष करीत आहे. ही दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी १० वाजता कपिलनगरात घडली. रितू प्रफुल्ल सहारे (२७, रा.बाबा दीपसिंगनगर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर तिचा पती प्रफुल्ल नरेश सहारे (३०) याच्यावर उपचार सुरू आहे.
सहा वर्षांपूर्वी रितू आणि प्रफुल्लचा विवाह झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. मागील काही दिवसांपासून पती-पत्नीत वाद सुरू होता. गुरुवारी सकाळी रितू नळाचे पाणी भरत होती. पाणी भरल्यावर नळ सुरू राहिल्याने प्रफुल्ल तिच्यावर ओरडला व नळ बंद करण्यास सांगितले. या मुद्यावरून दोघांत वाद झाला. संतापलेल्या रितूने प्रथम ब्लेडने हाताची नस कापली आणि नंतर ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान स्नानगृहातून बाहेर आलेल्या प्रफुल्लला रितू गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यानेही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी कपीलनगर पोलिसांनी रितूची आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Leave a Reply