कोरोनात आईवडील गमावलेल्या मुलांचे पालकत्व वडिलांच्या आईवडिलांना – सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

नवी दिल्ली : १० जून – ‘भारतीय समाजात वडिलांचे आई-वडील हे नेहमीच आपल्या नातवंडांची काळजी अधिक चांगल्या पद्धतीने घेतात, त्यांची नातवंडांशी अधिक भावनिक जवळीक असते,’ अशी टिपण्णी करत, करोनाच्या दुसऱ्या लाटेत आई-वडील गमावल्याने अनाथ झालेल्या सहा वर्षांच्या मुलाचा ताबा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी त्याच्या वडिलांच्या आई-वडिलांकडे दिला.
या बालकाच्या वडिलांचा १३ मे रोजी, तर आईचा १२ जूनला करोनामुळे अहमदाबादमध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर आईकडील आजी आजोबांनी त्याला आपल्या घरी आणले. यावेळी वडिलांकडील आजी- आजोबांनी नातवाच्या शिक्षणाच्या संदर्भात चिंता व्यक्त करत मुलाचा ताबा मागितला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निर्णय दिला.
गुजरात उच्च न्यायालयाने या बालकाचा ताबा त्याच्या मावशीकडे दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. एम. आर. शहा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने उच्च न्यायालयाचा हा निर्णय रद्द केला. दाहोडच्या तुलनेत अहमदाबादमध्ये त्याचा चांगले शिक्षण मिळू शकेल, असेही न्यायालयाने म्हटले. मात्र बालकाच्या मावशीला या बालकाला भेटण्याचे अधिकार असतील, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. या मुलाचा ताबा त्याच्या वडिलांच्या आई-वडिलांकडे देण्यास नकार देण्यासाठी उत्पन्न हा एकमेव निकष असू शकत नाही, असेही न्यायालयाने नोंदवले.
दरम्यान, उच्च न्यायालयाने आई-वडिल गमावलेल्या या मुलाचा ताबा त्याच्या मावशीकडे दिला होता. मुलाच्या वडिलांकडील आजी- आजोबांचे वय हे अनुक्रमे ६३ आणि ७१ वर्ष आहे. असं असताना नातवाच्या ताब्यासाठी आजी-आजोबांच्या वयाचा विचार करुन जास्त वयाचे लोक सशक्त राहतात, असं कोर्टाने म्हटलं होतं.

Leave a Reply