उच्च न्यायालयाने नवाब मलिक व अनिल देशमुखांना राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाची परवानगी नाकारली

मुंबई : १० जून – राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी आज निवडणूक प्रक्रिया होत आहे. या निवडणुकीत सहा जागांवर सात उमेदवार रिंगणात आहेत. सहावा उमेदवार विजयी करण्यासाठी आवश्यक असलेली मते कुठल्याच राजकीय पक्षांकडे नसल्याने एक-एक मत अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी लहान पक्ष आणि अपक्षांचीही मदत घेण्यात येत आहे. मात्र, सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोन आमदार हे अटकेत आहेत. त्यामुळे या आमदारांनाही निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. मात्र, सत्र न्यायालयाने मतदानाची परवानगी नाकारली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली. आज या याचिकेवर सुनावणी झाली आणि मुंबई उच्च न्यायालयाने आपला निकाल दिला आहे.
उच्च न्यायालयाकडून नवाब मलिकांना मतदानाची तूर्तास परवानगी नाकारण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयानं दिलेला निकाल हायकोर्टाकडून कायम ठेवण्यात आला. मात्र नवाब मलिकांना याचिकेत सुधारणा करून पुन्हा दाद मागण्याची परवानगी मागितली. याचिकेतील जामीनाचा मुद्दा काढून केवळ बंदोबस्तात मतदानाची परवानगी देण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर आता थोड्यावेळात नव्या याचिकेसह पुन्हा सुनावणी होणार आहे.
ही याचिका सुनावणीसाठी योग्यच नाही असा दावा सरकारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या महाधिवक्ते अनिल सिंग यांनी न्यायालयात केला. त्यावर नवाब मलिकांच्या वकीलांनी युक्तीवाद करताना म्हटलं, घटनात्मक अधिकार आहे तोच आम्ही मागतोय. आता नवाब मलिक कोठडीत नसून हॅास्पिटलमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना फक्त काही वेळ दिला तर त्यांना त्यांचा घटनात्मक अधिकार वापरता येईल.
नवाब मलिक यांच्या युक्तीवादाकरता ज्येष्ठ वकील अमित देसाई तर अनिल देशमुख यांच्या युक्तीवादाकरता आबाद पोंडा यांनी युक्तीवाद केला. तर सरकारी पक्षाची बाजू महाधिवक्ते अनिल सिंग यांनी मांडली.

Leave a Reply