मुंबई ; ९ जून – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत खणखणीत सभा घेऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. पण, ‘संभाजीनगरचे नामकरण, पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, विकासाची एखादी नवीन योजना. काही तरी ठोस मिळेल, अशी उगाच त्यांची अपेक्षा होती. पण, संभाजीनगरवासियांना मिळाले काय तर पुन्हा एकदा टोमणे आणि फक्त टोमणे’ असं म्हणत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
औरंगाबादमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विराट अशी सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी नुपुर शर्मा यांच्या वक्तव्यापासून ते ज्ञानवापी मशिदीपर्यंत जोरदार टीका केली. त्यांच्या या सभेबाबत फडणवीस यांनी ट्वीट करून प्रतिक्रिया दिली.
बांधावरची मदत ज्यांना स्मरत नाही, पेट्रोल-डिझेलचे दर जे स्वत: कमी करीत नाही, त्यांनी दुसऱ्यांना ‘अच्छे दिन’ सांगावे, म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि..! माझे पुन्हा सवाल आहेत, शेतकऱ्यांना मदत केव्हा करणार? पेट्रोल-डिझेलचे दर केव्हा कमी करणार? असा सवाल फडणवीस केला.
तसंच,संभाजीनगरचे नामकरण, पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, विकासाची एखादी नवीन योजना. काही तरी ठोस मिळेल, अशी उगाच त्यांची अपेक्षा होती. पण, संभाजीनगरवासियांना मिळाले काय तर पुन्हा एकदा टोमणे आणि फक्त टोमणे’ असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.