शेतकऱ्यांना योग्य त्या कंपनीचेच बियाणे द्यावे – राजेश टोपे यांचे बियाणे विक्रेत्यांना आवाहन

मुंबई : जून – बियाण्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या अनेक घटना राज्यात घडताना दिसत आहेत. यामुळे एकीकडे करोनाचे संकट पुन्हा येत असताना, आता शेतकऱ्यांसमोर बोगस बियाणांचे संकट देखील निर्माण होत आहे. याचा फटका शेती उत्पादनावर दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज बियाणे विक्रेत्यांना एक आवाहन केले आहे.
राजेश टोपे यांनी म्हटले आहे की, “बियाण्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या काही बाबी आमच्या निदर्शनास आल्या आहेत. माझे सर्व दुकानदारांना विनंतीवजा आवाहन आहे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना योग्य त्या कंपनीचेच बियाणे द्यावे.”
तसेच, “हा बळीराजा तुमच्यावर मोठा विश्वास ठेवून बियाणे खरेदी करतो. कोणत्याही तात्पुरत्या फायद्याकरता शेतकऱ्यांचा विश्वास आपण तोडू नये, एकदा हा विश्वास तुटला तर तो पुन्हा मिळणे अशक्य आहे. या बियाण्यांच्या भरोशावर शेतकरी संपूर्ण वर्ष पिकांची वाट बघतात आणि मग बियाणे खराब निघाले तर संपूर्ण वर्ष वाया जाते. याची परिणीती म्हणून नंतरचे दोन ते तीन वर्षे शेतकरी कर्जबाजारी होऊन डबघाईस येतो. हाच कर्जबाजारी शेतकरी मग जीवनात काहीतरी टोकाचा निर्णय घेतो. असे चित्र निर्माण होऊ नये म्हणूनच माझी सर्व बियाणे दुकानदारांना पुन्हा एकदा विनंती आहे, शेतकऱ्यांना चांगले व दर्जेदार बियाणेच सुचवून खरेदी करण्याचा आग्रह करा. सर्व बियाणे दुकानदार हे सुद्धा एक शेतकरीच आहेत. बळीराजा जगला तरच आपण सगळे जगू !” असंही राजेश टोपे यांनी ट्वीटद्वारे केलेल्या आवाहनात म्हटले आहे.
राज्य सरकारने त्यांच्या पातळीवर यंदा नियोजनबद्ध खरीप हंगामाची पूर्वतयारी केली आहे. कृषी विभागाने विभागनिहाय, जिल्हानिहाय आणि आणि तालुकानिहाय खरीप हंगमाच्या पूर्वतयारीच्या बैठका यशस्वीपणे घेतल्या आहेत. संबंधित यंत्रणेला योग्य त्या सूचनाही दिल्या आहेत. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी दर्जेदार खते, बियाणे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विभागवार नियोजन करण्यात आले आहे. साठेबाजी आणि बोगसगिरी करणाऱ्यांविरुद्ध भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यामुळे बोगस बियाणे आणि बोगस औषधांच्या कंपन्या कृषी विभागाच्या धाडसत्रात सापडतही आहेत. शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी सर्व पातळीवर प्रयत्नशील आहेच, पण शेतकऱ्यांनीही स्वत: आपली फसवणूक होवू नये म्हणून काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे कृषी विभाग, कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ, शास्त्रज्ञ यांनी सांगितलेल्या काही गोष्टींचे पालन करण्याची जबाबदारी शेतकऱ्यांनी आता स्वीकारायला हवी. कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्यासाठी महत्त्वाचे कारण ठरणारे शुद्ध बियाण्याबाबत आता शेतकऱ्यांनी स्वत: सजग होण्याची वेळ आली आहे.
बियाण्याच्या पिशवीला लावलेल्या टॅगवरील सर्व माहिती वाचून त्याविषयी खात्री झाल्यानंतर शेतकऱ्यांनी विक्रेत्यांकडून बियाणे खरेदीची पक्की पावती म्हणजे बिल घ्यावे. या बिलावर बियाण्याचा वाण तसेच गट क्रमांक, बियाणे खरेदीची तारीख लिहिली आहे की नाही याची खात्री करावी. पुढे जर बियाण्यात काही दोष आढळल्यास तक्रार करताना या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्याशिवाय तक्रार ग्राह्य मानली जात नाही. त्यामुळे बियाणे खरेदीची पक्की पावती अतिशय महत्त्वाची असते.

Leave a Reply