नुपूर शर्मा यांच्या विधानामुळे पहिल्यांदाच देशाला माफी मागावी लागली – संजय राऊत

मुंबई : ७ जून – गेल्या दोन दिवसांपासून देशभरात नुपूर शर्मा हे नाव चर्चेत आलं आहे. प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी भाजपाच्या प्रवक्त्या असलेल्या नुपूर शर्मा यांना पक्षानं निलंबित केलं आहे. या प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय स्तरावरून देखील इस्लामिक राष्ट्रांकडून निषेधाचा सूर उमटत असताना देशांतर्गत राजकारणात विरोधकांकडून भाजपाला लक्ष्य केलं जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना या मुद्द्यावरून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, त्यांनी भाजपावर धर्माचं राजकारण अंगलट आल्याचा देखील आरोप केला आहे.
नुपूर शर्मा यांच्या विधानामुळे पहिल्यांदाच देशाला माफी मागावी लागल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. “जगभरात जे वातावरण निर्माण झालंय, त्यामुळे प्रथमच या देशाला माफी मागावी लागली आहे. सगळे देश भारतावर टीका करत नाहीयेत, पण त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. पहिल्यांदाच एखाद्या लहान देशाकडून मोठ्या देशाकडे माफी मागण्याचा आग्रह होतोय”, असं राऊत म्हणाले आहेत.
“याआधी अशी हिंमत कधी कुणी केली नव्हती. पण भाजपाने ज्या प्रकारचे विषारी विचार या देशात पेरण्याचा प्रयत्न सुरू केलाय, त्यातून त्यांचं त्यांच्या लोकांवरचं नियंत्रण सुटलंय. ते धर्मा-धर्मात तेढ निर्माण करून राजकारण करतायत. हा संपूर्ण प्रकार भाजपाच्या अंगलट आला असला, तरी त्यातून देशाची बदनामी झाली आहे”, असा आरोप देखील राऊतांनी केला आहे.

Leave a Reply