वर्धेत होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अभय बंग यांची निवड करा – अनेकांची मागणी

गडचिरोली : ३ जून – वर्धा येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विनोबा-गांधी विचारांचे कृतिशील विचारवंत, लेखक, संशोधक पद्मश्री डॉ अभय बंग हवेत अशी मागणी आता समोर आली आहे. आगामी अखिल भारतीय साहित्य संमेलन जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात वर्धा येथे होऊ घातले आहे. साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष कोण याची चर्चा सुरू झाली आहे. त्यात अनेक नावे समोर येत आहेत. अध्यक्ष पदासाठी एक पेक्षा अधिक दावेदार राहिल्यास निवडणूक होईल, राजकारण होईल. परंतु गांधी विनोबांच्या विचारावर मार्गक्रमण करीत सेवाग्राम ते शोधग्राम असा प्रवास करणारे, गांधी विनोबांच्या विचारांचे कृतिशील विचारवंत लेखक व संशोधक म्हणून डॉक्टर अभय बंग यांची सर्वसहमतीने निवड व्हावी अशी मागणी आता समोर आली आहे. अनेकांनी ही मागणी बोलून दाखवली आहे. मात्र डॉ. बंग यांच्याकडून अजूनही त्याबाबत अधिकृत काहीही बोलले गेले नाही.
गडचिरोली जिल्ह्यातील अनेकांनी ही आमची प्रामाणिक इच्छा आहे असेही म्हटले आहे.माझा साक्षात्कारी हृदयरोग या पुस्तकाने डॉक्टर अभय बंग घरोघरी पोचलेले आहे. वैद्यकीय जगताबरोबरच अनेक सामाजिक व सांस्कृतिक प्रश्नांवर डॉक्टर बंग यांचे चिंतन व कृती महत्त्वपूर्ण आहे. १९९३ मध्ये लोकचळवळीच्या माध्यमातून डॉ.अभय बंग यांच्या नेतृत्वात लागू झालेली दारूबंदी,अनेक साहित्यकृती,वैचारिक दिशा देणारे लेख डॉ. अभय बंग यांचे नावे आहेत.गांधी विनोबांच्या कर्मभुमीत वर्धा येथे होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गांधी विनोबा विचारांचे पाईक असलेले अभय बंग हेच सर्वथा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हावेत यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, ही सर्वांना कळकळीची विनंती आहे असे आवाहन गडचिरोलीतील सामाजिक कार्यकर्ते सूर्यप्रकाश गभने यांनी केली आहे.

Leave a Reply