पक्षाकडून काही मागण्यापेक्षा काम करत राहिले तर पक्षच तुमची दखल घेतो – आदेश बांदेकर

नागपूर : ३ जून – राजकारणात येण्याचा कुठलाच विचार नव्हता मात्र, बाळासाहेबांवर माझी श्रद्धा होती. कलावंत म्हणून काम करताना काही न मागता मला शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला. त्यामुळे आता विधानपरिषदेबाबत मी विचार केलेला नाही. पक्षाकडून काही मागण्यापेक्षा काम करत राहिले तर पक्षच तुमची दखल घेतो असे अभिनेते आदेश बांदेकर म्हणाले.
आदेश बांदेकर त्यांच्या होम मिनिस्टर या दूरदर्शनवरील एका मालिकेच्या ऑडिशनसाठी नागपूरला आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना खरेतर रंगमंच व मालिकांमध्ये काम करत असताना शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षाचा सचिव झालो. त्यानंतर पक्षाने माझ्यावर सिद्धी विनायक मंदिराचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविली. त्यानिमित्ताने राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे पक्षाने जे आदेश दिले त्या आदेशानुसार काम करत आहे. काही मागण्यापेक्षा आपण काही देऊ शकतो याचा विचार करत असतो असेही बांदेकर म्हणाले.
तसेच “नागपूरातील धनवटे रंगमंदिर व वसंतराव देशपांडे सभागृहाने माझ्या आयुष्यात नवीन वळण आले. नागपूरचे नाट्यकलावंत सुरेश मगरकर यांनी १९८४ मध्ये गर्दीत असलेल्या आदेश बांदेकरला प्रभाकर पुराणिक लिखित चेतना चिंतामणीचे गाव या नाटकात भूमिका दिली. त्याच काळात राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने धनवटे रंग मंदिरात नाटक करण्याचा योग आला आणि तेव्हापासून हा प्रवास सुरू आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने नाट्य कलावंत स्वत:ला घडवू शकलो,” असेही बांदेकर म्हणाले.
मालिकेच्या माध्यमातून साडेपाच हजार घरात जाऊन स्त्रिंयांचा सन्मान करता आला. महिलांवर अत्याचार होतात. मात्र कोल्हापूर च्या एका महिलेने सांगितलं की प्रत्येक घरात असे भाऊजी असायला पाहिजेत म्हणजे नाते घट्ट होतात. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी माझा तसा संबंध नाही पण शंभरावे नाट्य संमेलन जोरात व्हावे, यासाठी जिथे जिथे माझी मदत लागेल ती करायला मी तयार असल्याचे आश्वासन बांदेकर यांनी दिले.
पुढे बोलताना त्यांनी मुंबईतील सिद्धीविनायक ट्रस्टच्या कामावर भाष्य केले. “माझ्यावर मोठ्या विश्वासाने या संस्थानच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मी त्याला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे. कामासाठी राज्यभर धावपळ सुरू असली तरी ट्रस्टची कामे प्रलंबित ठेवत नाही. गरिबांना मदत देण्याची कामे तर प्राधान्याने करतो. आतापर्यंत अशा मदतीच्या दीड लाखापेक्षा जास्त धनादेशांवर आपण स्वाक्षरी केल्या आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी, राज्यातील शहीद जवानांची मुले यांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च ट्रस्टतर्फे केला जातो. याशिवाय नागरिकांना वैद्यकीय उपचारांसाठी मदतही दिली जाते. ही सर्व कामे वेळेत होत आहेत,” असे बांदेकर म्हणाले.

Leave a Reply