आयात उमेदवारांमुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो – संजय राऊत

मुंबई : १ जून – राज्यसभा उमेदवारीवरुन काँग्रेसला पक्षांतर्गत नाराजीला सामोरं जावं लागत असताना शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनीदेखील यावर भाष्य केलं आहे. संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. आयात उमेदवारांमुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर यापुढे त्यांनी चाणाक्षपणे पावलं टाकावीत असा सल्ला प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे.
ते म्हणाले की, “काँग्रेस पक्षाचा हा अंतर्गत विषय आहे. पण तरी देशाचं राजकारण पाहता काँग्रेसने या निवडणुकीत अत्यंत चाणाक्ष आणि सावधगिरीने पावलं टाकायला हवी होती असं मला वाटतं. गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातून काँग्रेस पक्ष बाहेरची माणसं पाठवत आहे. याचा परिणाम राज्यातील काँग्रेस पुढारी आणि कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर होऊ शकतो”.
“महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये काही तोलामोलाची माणसं कमी नाहीत. उत्तम माणसं, कार्यकर्ते आहेत. मी फार बोलणं बरं नाही पण छत्तीसगड आणि राजस्थानमध्येही तिथेही सर्व उमेदवार बाहेरचे आहेत. याचा परिणाम स्थानिक कार्यकर्त्यांवर होते. फक्त काँग्रेसच नाही तर इतर पक्षातही असे निर्णय घेतले जातात तेव्हा स्थानिक लोक दुखावले जातात. विशेषत: काँग्रेस पक्षाला सर्वांना घेऊन पुढे जाण्याची जास्त गरज आहे,” असंही संजय राऊत म्हणाले.
काँग्रेसने राज्यसभेची उमेदवारी देताना राहुल व प्रियंका गांधी यांच्या विश्वासातील नेत्यांची वर्णी लावल्यामुळे पक्षांत धुसफुस सुरू झाली आहे. पक्षप्रवक्ते पवन खेरा, आचार्य प्रमोद कृष्णम, राजस्थानमधील आमदार संयम लोढा, नगमा अशा अनेक नेते-पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसने रविवारी रात्री उशिरा दहा उमेदवारांची यादी जाहीर केली.
‘‘कदाचित माझी तपस्या कमी पडली असावी,’’ असे ट्वीट करून पवन खेरा यांनी खदखद व्यक्त केली. राहुल व प्रियंका यांच्या निकटवर्तीय मानले जाणारे राष्ट्रीय प्रवक्ता व महासचिव रणदीप सुरजेवाला यांनाही राज्यसभेची उमेदवारी दिली गेली आहे. हरियाणातून विधानसभेची पोटनिवडणूक हरणाऱ्या सुरजेवाला यांना हरियाणामधून एक जागा रिक्त होत असतानाही राज्यस्थानमधून वरिष्ठ सभागृहात पाठवले जाणार आहे. खेरा यांनी उमेदवारी मिळालेल्या दहाही नेत्यांचे अभिनंदन केले.
राजस्थानमध्ये काँग्रेसला तीन जागा जिंकता येतील, पण या जागांवर प्रदेश नेतृत्वाकडून मागणी करूनदेखील स्थानिक उमेदवार दिला गेला नाही. तिथून सुरजेवाला, मुकुल वासनिक व प्रमोद तिवारींना संधी देण्यात आली आहे. राजस्थानमधील अपक्ष आमदार संयम लोढा यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली असून उदयपूर चिंतन शिबिरानंतरही काँग्रेसमध्ये कोणताही बदल झाला नसल्याचा अप्रत्यक्ष आरोप करत, लोढा यांनी, ‘‘राजस्थानमधील काँग्रेस नेता वा पदाधिकाऱ्याला राजस्थानमधून उमेदवारी का दिली गेली नाही’’, असा सवाल त्यांनी थेट प्रियंका गांधी-वाड्रा यांना केला आहे.
गुलाम नबी आझाद ,आनंद शर्मा, तारिक अन्वर यांच्या ४० वर्षांच्या अनुभवाकडे दुर्लक्ष केले गेले, अशी टीका आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केली आहे. या ज्येष्ठांना हुतात्मा का केला जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आझाद, शर्मा यांना राज्यसभेसाठी पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली नाही.

Leave a Reply