अन्यथा आम्ही अमरावतीत मंत्र्यांच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाही – ऑफलाईन परिक्षांवरून रवी राणांचा इशारा

अमरावती : ३१ मे – कोरोना दरम्यान शिक्षण क्षेत्रातील सर्व घडामोडी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. याच पार्श्वभूमीवर रुग्ण संख्या घटत असताना यंदा प्रथमच अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येत आहेत. मात्र, या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असून या परीक्षा मल्टिपल चॉइस क्वेश्चन पद्धतीने ऑफलाईन घ्याव्यात, अशी मागणी आमदार रवी राणा यांनी आज कुलगुरुंना भेटून केली.
अमरावती विद्यापीठातील सर्व परीक्षा मल्टिपल चॉइस क्वेश्चन पद्धतीने घेण्यात याव्या, या मागणीसाठी आज युवा स्वभिमानच्या वतीने कुलगूरू दिलीप वानखेडे यांची भेट घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन मल्टिपल चॉइस क्वेश्चन पद्धतीने व्हावी यासाठी आग्रही मागणी झाली.यावर उत्तर देत परीक्षा नियंत्रकांनी त्यांनी म्हटले की, या परीक्षांसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर विद्यापीठ भूमिका स्पष्ट करेल.
यावेळी रवी राणांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. “विद्यार्थांना जर ही मागणी करावी लागत आहे की आम्हाला अशा पद्धतीची परीक्षा पाहिजे, जर हे विद्यार्थ्याला सांगायची गरज पडत असेल तर कुलगुरू काय झोपा काढत आहेत का, राज्याचे शिक्षण मंत्री झोपा काढत आहेत का?. वेळ पडल्यास आम्ही मंत्रालयात आंदोलन करू, मुख्यमंत्र्यांकडे जाऊ. अन्यथा आम्ही अमरावतीत मंत्र्यांच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाही”, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

Leave a Reply