एकाच परिवारातील ५ जणांचे विहिरीत आढळले मृतदेह

जयपूर : २९ मे – राजस्थानच्या जयपूर शहरातील दुडु भागात दोन बालकासह एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह एका विहिरीत आढळले. हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा पोलिसांना संशय आहे. मृतांमध्ये काली देवी (२७), ममता मीणा (२३) व कमलेश मीणा (२०) या बहिणी, हर्षित (४) आणि वीस दिवसांच्या एका बालकाचा समावेश आहे.
या तिन्ही बहिणींचा विवाह एकाच कुटुंबात झाला होता आणि सासरचे लोक त्यांचा छळ करत होते, असा आरोप असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मीनू का मोहल्ला भागात राहणारे हे कुटुंब बुधवारी बाजारात जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते. ते घरी न परतल्यामुळे नातेवाईकांनी ते हरवल्याची भित्तीपत्रके ठिकठिकाणी लावली होती, तसेच पोलिसांत तक्रारही केली होती. मृतदेह विहिरीत आढळल्यानंतर ते बाहेर काढून शवचिकित्सेसाठी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply