ब्राम्हण समाज आरक्षणाच्या सूत्रात बसत नाही – शरद पवार

पुणे : २२ मे – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतीच ब्राह्मण समाजातील संघटनाप्रमुखांची भेट घेतली. यावेळी ब्राह्मण समाजाकडून शरद पवार यांच्यासमोर आरक्षणाची मागणी मांडण्यात आली. ग्रामीण भागातील हा वर्ग हा नागरी भागात जास्त आलेला आहे. त्यामुळे साहजिकच नोकरीच्या क्षेत्रात ब्राह्मण समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अशी संघटनांनी मागणी केली होती. मात्र, शरद पवार यांनी ही मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. ब्राह्मण समाजाची सामाजिक स्थिती पाहता, आरक्षणाच्या सूत्रात ते बसत नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.
यावर ब्राह्मण समाजाच्या नेत्यांनी मग कोणालाच आरक्षण देऊ नका, अशी भूमिका घेतली. तेव्हा शरद पवार यांनी म्हटले की, आरक्षण कुणालाच देण्यात येऊ नये, असे करता येणार नाही. ब्राह्मण समाज आरक्षणाच्या सूत्रात बसत नसला तरी दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीयांचं आरक्षणही काढून घेता येणार नाही. देशातील दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीयांना आरक्षण द्यावंच लागेल. हा वर्ग शैक्षणिक, सामाजिक प्रगतीसंदर्भात मागे राहिलेला आहे. त्यामुळे इतरांच्या स्तरापर्यंत तो येईपर्यंत त्याला विरोध करू नये, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.
या बैठकीकरिता विविध जिल्ह्यांमधून सुमारे ४० ब्राह्मण संघटनांचे पदाधिकारी शरद पवारांची भेट घेण्यासाठी पुण्यात आले होते. हे ४० जण ब्राह्मण समाजातील सुमारे ९ ते १० संघटनांचे सदस्य होते. या संघटनांनी आपल्या मागण्या पवार यांच्यासमोर मांडल्या. या संघटनांच्या सदस्यांनी ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी परशुराम महामंडळ स्थापन करण्यात यावे, अशी मागणीही केली. पण हा विषय माझ्या हातात नाही. राज्य सरकार त्याबाबत निर्णय घेऊ शकते. राज्य सरकारशी संबंधित सर्व विषय मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवेन, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले.
राज्यात वातावरण खराब झालंय, असं मला पटत नाही. जबाबदार लोकांनी, जबाबदार राजकीय पक्षाच्या लोकांनी केलेल्या वक्तव्यांनी एक समाजात अस्वस्थता असेल तर त्याची दखल घेऊन, चर्चा करुन ती कमी करण्याचा प्रयत्न केला आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. माझ्या पक्षातील काही सदस्यांनी ब्राह्मण समाजाविषयी वक्तव्ये केली होती. त्याविषयी पक्षांतर्गत बैठकीत चर्चा आधीच झालेली आहे. नेत्यांनी कोणत्याही जाती-धर्माविषयी बोलू नये. एखाद्याच्या धोरणांबाबत किंवा कार्यक्रमाविरुद्ध बोलण्याचा आपल्याला अधिकार आहे. जातीविषयक वक्तव्ये कुणीच यापुढे करू नये, अशी सूचना नेत्यांना आधीच देण्यात आल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

Leave a Reply