केंद्र सरकारनं पाकिस्तानात जाऊन दाऊदची गचांडी पकडली पाहिजे – संजय राऊत

मुंबई : २२ मे – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कपातीवर निर्णय मुख्यमंत्री घेतील असं म्हटलं आहे. हे कर कमी केले होते ते अगोदर वाढवले होते. १५ रुपये वाढवले होते आणि ९ रुपये कमी करायचे असं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचं काम केंद्र सरकारचं काम आहे. केंद्र सरकारनं महाराष्ट्राच्या वाट्याची जीएसटीची रक्कम परत द्यावी. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेत्यांनी जीएसटी परताव्यासाठी केंद्राकडे तगादा लावला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
बाळासाहेबांचं राजकारण शिल्लक आहे त्यामुळं महाराष्ट्रात सरकार स्थिर आहे. यापूर्वी आम्ही अटलजींचं ऐकत होतो त्यावेळी चंद्रकांत पाटील कुठेच नव्हते. शरद पवारांचं मार्गदर्शन नरेंद्र मोदी घेतात. चंद्रकांत पाटील यांचा अभ्यास कमी आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
भाजपच्या केंद्र सरकारनं पाकिस्तानात जाऊन दाऊदची गचांडी पकडली पाहिजे. फक्त दाऊद दाऊद सुरु आहे. हे गेल्या ४० वर्षांपासून सुरु आहे.दाऊद कुठं आहे, कसा आहे ते केंद्राला माहिती आहे. दाऊदला केंद्रानं अमेरिकेप्रमाणं पकडावं. अमेरिकेनं पाकिस्तानात जाऊन लादेनला ठार मारलं त्याप्रमाणं केंद्रानं कारवाई करावी, असं संजय राऊत म्हणाले. मुंबई बॉम्बस्फोटाचा दाऊद सर्वात मोठा गुन्हेगार आहे. तुम्ही जगातील सर्वात मोठे नेते आहेत त्यामुळं तुम्ही त्याला पकडून आणा, असं राऊत म्हणाले. भाजपनं दाऊद दाऊद करण्यापेक्षा पाकिस्तानात जाऊन त्याला पकडून आणा असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं आहे.
राज ठाकरेंची सभा आहे, लोकशाही आहे, सभा लोकांनी घेतल्या पाहिजेत, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील कर कपात केल्यानंतर संजय राऊत यांना महाराष्ट्रात कर कपात केली जाणार का असं विचारलं असता, यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णय घेतील, असं म्हटलं आहे.

Leave a Reply