नवनीत राणा या मागासवर्गीय महिलेला तुरुंगात टाकून मुख्यमंत्र्यांनी नामर्दासारखे काम केले – रवी राणा

नवी दिल्ली : ११ मे – ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रत्येक सभेत आपण मर्द असल्याचं सांगतात. मात्र नवनीत राणा यांच्यासारख्या मागासवर्गीय महिलेला तुरुंगात टाकून त्यांनी नामर्दासारखं काम केलं आहे. दिवंगत बाळासाहेबही हे पाहून दु:खी होत असतील आणि विचार करत असतील की कोणाच्या हातात शिवसेनेचा कारभार गेला आहे,’ असं म्हणत अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका केली आहे. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
‘बाळासाहेब हिंदुत्ववादी होते, तुम्ही इंग्रजांच्या विचारांवर चालून त्यांनी तयार केलेल्या कायद्याच्या आधारे एका महिलेला तुरुंगात टाकलं. नवनीत राणा या तब्येत बिघडल्याने लीलावती रुग्णालयात गेल्या. तेथे एमआरआय करतानाचा फोटो बाहेर आला म्हणून शिवसेनेच्या लोकांनी रुग्णालयाला नोटीस दिली. महाराष्ट्रातील जनतेचे इतर महत्त्वाचे प्रश्न असताना सत्ताधारी शिवसेनेचे नेते एका रुग्णालयाच्या मागे लागले आहेत,’ असा हल्लाबोलही रवी राणा यांनी केला आहे.
दरम्यान, १४ मे रोजी उद्धव ठाकरे यांची मुंबईत सभा होत असल्याने आम्हीही १४ मेला सकाळी दिल्लीतील प्राचीन हनुमान मंदिरात जाऊन महाआरती करणार आहोत. तसंच मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातील प्रश्नांवर बोलण्याची सद्बुद्धी मिळावी, यासाठी प्रार्थना करणार आहोत, अशी घोषणा रवी राणा यांनी केली आहे.

Leave a Reply