देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंचा केला मर्सिडीज बेबी असा उल्लेख

नागपूर : ४ मे – “1857 च्या युद्धात ही देवेंद्र फडणवीस असतील,” असा टोला राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. या टीकेला उत्तर देताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना ‘मर्सिडीज बेबी’ हे नाव दिलं आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते. फडणवीस म्हणाले की, “सोन्याच्या चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली ‘मर्सिडीज बेबी’ आहे, त्यांनी ना संघर्ष करावा ना संघर्ष पाहावा लागला. त्यामुळे कारसेवकांची थट्टा ते नक्की उडवू शकतात. मी हिंदू आहे त्यामुळे मागच्या जन्मावर विश्वास आहे. त्यामुळे 1857 मध्ये मी नक्की तात्या टोपे आणि झाशीची राणी यांच्याबरोबर युद्धात असेन आणि हे त्याही वेळी इंग्रजाबरोबरच युतीमध्ये असणार. तुम्ही आताही अशा लोकांशी युती केली आहे जे 1857 ला स्वातंत्र्य युद्धच मानत नाही. ते त्याला सैनिकांचे बंड म्हणतात.”
बाबरी मशीद पाडली तेव्हा एकही शिवसैनिक उपस्थित नव्हता, मी उपस्थित होतो, असा दावा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना आदित्य ठाकरे यांनी टोला लगावत, फडणवीस 1857 च्या युद्धातही असतील असं म्हणलं होतं.
उद्धव ठाकरे आणि माझ्या पत्नीमध्ये एक साम्य…
काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारं ट्वीट केलं होतं. तर ‘महाउत्सव’च्या कार्यक्रमात गाण्यावरुन अमृता फडणवीस यांना टोला लगावला होता. त्याला अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुनच उत्तर दितं. या दोघांमध्ये सुरु असलेल्या शाब्दिक युद्धाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “उद्धव ठाकरे आणि माझ्या पत्नी अमृता यांच्यामध्ये एक साम्य आहे. उद्धवजी टोमणे मारणे सोडत नाहीत आणि माझी पत्नी नको त्या गोष्टींना उत्तर देणं सोडत नाही. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी देखील आपली पातळी वर ठेवली पाहिजे. अशाप्रकारचे काही आल्यानंतर माझं मत आहे की माझा पत्नीने उत्तर देण्याचं कारण नाही. अशा गोष्टी इग्नोर केल्या पाहिजेत. अर्थात हा त्या दोघांचा प्रश्न आहे. त्यामुळे मी यापेक्षा जास्त बोलणार नाही”
ओबीसी आरक्षण प्रश्नी सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दणका दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम दोन आठवड्यात जाहीर करा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यावरुनही फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, “आम्ही आधी कोर्टाची ऑर्डर समजून घेतो. पण जे प्राथमिक कळले त्यानुसार राज्य सरकारने ट्रिपल टेस्ट पूर्ण केली नाही. दोन वर्ष झाले. प्रशासक सहा महिन्यांच्या वर असू शकत नाही, म्हणून सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिला आहे. सरकारने ओबीसींची अपरिमित हानी केली आहे.”
राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा देत सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे तब्बल 12 दिवसांनी राणा दाम्पत्याची कोठडीतून सुटका होणार आहे. राणा दाम्पत्याला जामीन मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हनुमान चालीसा म्हटल्यामुळे राणा दाम्पत्यावर राजद्रोह लावण्याचा करंटेपणा सरकारने केला. हा विषय न्यायालयात टिकत नाही. त्यामुळे त्यांना जामीन मिळणं स्वाभाविकच होता.”

Leave a Reply