शिवसेनेच्या नेत्यांनी ठाण्यात उपचार घ्यावेत – आशिष शेलार

मुंबई : २ मे – देवेंद्र फडणवीसांवर तुमचा आरोप हा स्वप्नदोष असेल तर शिवसेनेच्या नेत्यांना बुद्धीदोष झाला आहे. राऊतांनी, शिवसेनेच्या नेत्यांनी ठाण्यात उपचार घ्यावेत, असा टोला भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना आणि संजय राऊतांना लगावला आहे. तसेच, त्यांनी बाबरी मशीद आंदोलनावरुनही शिवसेनेला सुनावलं आहे. तुमचा जन्म होण्यापूर्वीपासून हे आंदोलन सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.
बोलबच्चनगिरी करु नका. देशाला माहितीये बाबरी मशीद ढाचा पाडण्याचं हे आंदोलन साधू-संतांनी सुरु केलं, हिंदू समाजाने सुरु केलं. तुमचा जन्म ६० नंतरचा आहे. आंदोलन त्याच्या आधीपासून आहे. जन्म होण्यापूर्वी आणि गोदडी ओली करण्याच्या वेळेला मी कारसेवेला होतो हे म्हणणाऱ्यांनी आधी स्वत:चं आत्मपरिक्षण करावं. उगाचं श्रेय घेण्याच्या भानगडीत गडबड करु नका, असं म्हणत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टिकास्त्र सोडलं.
हनुमान चालीसेचा विषय भाजपचा नाहीये. पेट्रोलच्या विषयावर भाजपनेच काम केलंय. ज्या पद्धतीने भाजपने करात सवलत दिली, पंतप्रधानांनी त्याची आठवण करुन दिली. त्यावेळी कोल्हेकुई का करता. काँग्रेस त्यासाठी आंदोलनं करत होती. मग, आता स्वत:च्या सरकारला सांगा व्हॅट कमी करण्यासाठी, त्यावेळी पळ काढायचा. राजकारण हे तुमच्या डोक्यात घुसलेली घाण आहे. ती घाण पहिले साफ करा. जबाबदारी रामसेवकांनी घेतली. लढाई संघ हिंदू परिषद, भाजपने लढली. दुसऱ्यांच्या घरात काही झाल्यावर स्वत: पाय टाकणं हे जबाबदारी घेणं नाही. तुमच्या नावावर साधी एनसीही नाही, केसेसही नाहीत, मग तुम्ही काय अहवालाचं सांगता, असंही ते म्हणाले.
बॉम्ब ब्लास्टबद्दल तर बोलूच नका. त्यानंतर झालेल्या बॉब्म ब्लास्टच्या आरोपींशी तुमचा रोज आयस्क्रीम घाऊ घालण्याचा कार्यक्रम सुरुये. याकूब मेमनचे समर्थक अस्लम शेख असो, की हसिना पारकरसोबत व्यवहार करणारे नवाब मलिक असो. मुंबईकरांवर हल्ला करणाऱ्यांचे तुम्ही समर्थक आहात.
बाळासाहेबांवर आम्ही टीका नाही करणार, पण राऊतांचा, उद्धव ठाकरेंचा काय संबंध आहे. इतिहास बदलण्यात येत नाही, इतिहास बदण्याची ताकद राऊत तुमच्यात नाही. आमच्यासाठी बाळासाहेब हे वंदनीय होते आणि राहातील.
राष्ट्रवादीचं घड्याळ बंद पडल्याने प्रत्येक गोष्टीत त्यांना टायमिंग दिसतंय त्यांच्या घडाळ्याचे आकडे पुढे जात नसल्याने प्रत्येक गोष्टीत टायमिंग बघण्याची त्यांची सवय आहे.
चिथावणीची भाषणं बघायची असतील तर मग उद्धव ठाकरेंचीही भाषणं तपासावी लागतील. सर्वच पक्षांचं बघावं लागेल. एकाला टार्गेट करुन राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचं काम कोणी करु नये. बाकी कायद्याचं काम कायदा करेल. हा सगळा प्रकार ठाकरे सरकार, मविआ सरकारचं अपयश आहे. हनुमान चालीसा म्हटल्यावर राजद्रोह होतो हे ज्यावेळी माणलं जातं. त्यानंतरच असा प्रसंग घडतो की कोणीतरी शिवाजी पार्कवर आम्हाला आता नमाज पढू द्या अशी मागणी करतो. या सगळ्यामागे बोटचेपी भूमिका सरकारची आहे. आरती म्हणणाऱ्यांना तडीपारीच्या नोटीसा देणार असाल तर उद्या तुम्ही शिवाजी पार्कवर नमाज पठणाची परवानगी द्यायला मागेपुढे पाहाणार नाही. हे धंदे बंद करा.

Leave a Reply