भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापनेसंदर्भात २०१७ मध्येच ठरले होते – आशिष शेलारांचा गौप्यस्फोट

मुंबई, 28 एप्रिल : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांवर भाजप नेते आरोपांवर आरोप करत आहेत. तर मविआचे नेते त्या आरोपांना प्रत्युत्तर देत भाजपवर सुद्धा आरोप करताना दिसून येत आहेत. मात्र, असे असतानाच आता भाजप नेते आशिष शेलार यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार स्थापनेच्या संदर्भात 2017 मध्येच ठरलं होतं असा गौप्यस्फोट शेलारांनी केला आहे.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार स्थापन करण्याच्या संदर्भात 2017 मध्येच चर्चा झाली होती. इतकेच नाही तर निवडणुकीच्या संदर्भात जागा वाटप आणि त्यानंतर सत्तेत आल्यावर खातेवाटपाच्या संदर्बातही चर्चा झाली होती. भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं तिघांचं सरकार असण्याच्या संदर्भात चर्चा झाली.
शिवसेनेला दूर न करण्याचा सल्ला भाजपच्या केंद्रातील नेत्यांनी दिला होता. पण शिवसेना सोबत असताना युती करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने नकार दिला आणि त्यामुळे शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी असं सरकार स्थापन झालं नाही असं आशिष शेलार म्हणाले. एका खासगी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या दृष्टी आणि कोन या कार्यक्रमात आशिष शेलार यांनी हे विधान केलं आहे.
बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेना-भाजप युतीमध्ये मैत्रिपूर्ण संबंध होते. पण बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेत्रृत्वात शिवसेनेसोबत भाजपचे पूर्वीसारखे मैत्रीपूर्ण संबंध राहिले नाहीत असंही आशिष शेलार यांनी म्हटलं.
आशिष शेलार यांनी केलेल्या या विधानावर आता राष्ट्पवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते हे पहावं लागेल.

Leave a Reply