सध्या एकमेकांना संपवण्याचा कार्यक्रम सुरू – अशोक चव्हाण

नांदेड : २३ एप्रिल – राज्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी सध्याच्या राजकारणावरुन केंद्र सरकार आणि राज्यातील विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे. देशाच्या प्रगतीत विरोधक आणि सत्तेतील सगळ्यांचा हातभार लागला पाहिजे. पण सध्या तर एकमेकांना संपवण्याचा कार्यक्रम सुरू आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.
बाराव्या शतकात लोकशाहीची बीजे रोवत समतेचा प्रसार आणि प्रचार करणारे थोर समाज सुधारक जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या नांदेड येथील अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. श्री केदार जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते मंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जगतज्योति महात्मा बसवेश्वर यांची विचारसरणीच समाजाला व देशाला दिशादर्शक असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटलं की, दरम्यान देशात चाललंय काय? राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीत विरोधक आणि सत्तेतील सगळ्यांचा हातभार लागला पाहिजे. पण सध्या तर एकमेकांना संपवण्याचा कार्यक्रम सुरू आहे, असं ते म्हणाले.
चव्हाण यांनी म्हटलं की, लोकशाहीत राजकीय विरोध असायला पाहिजे पण राज्यात जे व्यक्तिगत राजकारण चालू आहे. ज्यात याला संपवा त्याला संपवा असे वातावरण झालेय. त्यामुळे हे महाराष्ट्रात चालणार नाही. कारण लोक ठरवतील कुणास सत्तेत बसवायचे व कुणाला खाली बसवायचे. पण राज्यात लोकशाहीला मारक असे राजकारण सुरू आहे असेही ते म्हणाले.
यावेळी विविध मठांचे प्रमुख, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ईश्वराराव भोसीकर, शिवा संघटनेचे प्रमुख मनोहर धोंडे, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, यांच्यासह हजारो बसवेश्वर भक्तांची यावेळी आवर्जून उपस्थिती होती.

Leave a Reply