यशोमती ठाकूर याच अचलपूरमधील घटनेच्या मास्टरमाईंड – अनिल बोंडे यांचा आरोप

अमरावती : १९ एप्रिल – मंत्री यशोमती ठाकूर याच अचलपूरमधील घटनेच्या मास्टरमाईंड असल्याचा खळबळजनक दावा अचलपूर प्रकरणी भाजप नेते अनिल बोंडे यांनी केला आहे. 12 नोव्हेंबर रोजी अमरावतीत घडलेल्या मुस्लिम मोर्चामध्येही त्यांचाच हात होता, असंही अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे. यशोमती ठाकूर यांचा सहभाग असल्यामुळेच त्या मोर्चामध्ये सहभागी असलेल्या मुस्लिमांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा आरोपही बोंडे यांनी केला आहे. दरम्यान, आज अचलपूर घटनेच्या निषेधार्थ भाजपच्या वतीनं अमरावतीत निदर्शनं करण्यात आली. त्यावेळी भाजप नेते अनिल बोंडे यांनी बोलताना हा दावा केला आहे.
सध्या अचलपूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. तसेच जमावबंदीचे आदेशही कायम आहेत. याप्रकरणी सध्या भाजप शहराध्यक्षांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात दुल्ला गेट परिसरातील झेंडा काढल्याचा वादावरून दोन समुदाय पुढे आल्यानं तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जमाव पांगविला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुरांच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. पोलिसांनी याप्रकरणी 23 जणांना अटक केल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या अचलपूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

Leave a Reply