भाजप सरकार धार्मिक ध्रुवीकरण या एकमेव उद्दिष्टासाठी काम करत असल्याचं दिसून येत आहे – सीताराम येचुरी

नवी दिल्ली : १४ एप्रिल – रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रांना देशभरातील विविध ठिकाणी हिंसेचं गालबोट लागलं. या घटनांमध्ये काही लोकांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक जखमीही झाले. या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ‘हिंसक घटना घडवणाऱ्या घटकांबाबत नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगलं असल्याने या घटकांना सरकारी पातळीवरून संरक्षण असल्याचं स्पष्ट होतं,’ असा आरोप सीताराम येचुरी यांनी केला आहे.
‘रामनवमीच्या दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात धार्मिक तणावाच्या घटना याआधी कधी पाहायला मिळाल्या नाहीत. मात्र केंद्रातील भाजप सरकार धार्मिक ध्रुवीकरण या एकमेव उद्दिष्टासाठी काम करत असल्याचं दिसून येत आहे. या मुद्द्याला आमचा पक्ष जोरदार विरोध करणार आहे आणि आगामी काळात इतर विरोधी पक्षांनाही यासाठी आम्ही सोबत आणण्याचा प्रयत्न करू,’ अशी माहिती सीताराम येचुरी यांनी दिली आहे.
देशात हिंसक घटना घडत असताना पंतप्रधान मोदींच्या तोंडून एक शब्दही निघत नाही, विविध राज्यांमध्ये झालेल्या हिंसक घटना खूप धोकादायक आहेत,’ असंही येचुरी म्हणाले.
सीताराम येचुरी यांनी केंद्र सरकारला देशातील महत्त्वाच्या प्रश्नांची आठवण करून देताना म्हटलं की, ‘देशासमोर सध्या बेरोजगारी, उपासमार, महागाई असे गंभीर प्रश्न निर्माण झाले असून या प्रश्नांबाबत मात्र सरकारला कसलीही चिंता नाही. पंतप्रधान केवळ हिजाब, हलाल आणि अजानबद्दल बोलतात. धार्मिक ध्रुवीकरण करून सरकार या देशाचं खूप मोठं नुकसान करत आहे,’ असा हल्लाबोल येचुरी यांनी केला आहे.

Leave a Reply