नोटीस मिळाली असताना कायद्याने उत्तर दिले पाहिजे – देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊत यांना टोला

मुंबई : ६ एप्रिल – काही लोक नखं कापूनही शहीद होण्याचा प्रयत्न करतात अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांवर केली आहे. संजय राऊत लक्ष वेधून घेण्यासाठी सर्व बोलत आहेत असंही ते म्हणाले. मराठी माणसाच्या नावावर राजकारण करायचं आणि मराठी माणसाला लुटायचं हा धंदा मुंबईत कोण करतंय हे आता स्पष्ट होत आहे अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“आमच्या अनेक नेत्यांच्या घरात माणसे घुसवत मापं घेण्यात आली, नसलेल्या नोटीसी देण्याचं काम झालं. तरी आम्ही कायद्याने मुकाबला करण्याची भूमिका घेतली. जे काही पुरावे आहेत त्याच्या आधारे नोटीस दिली असून कायदेशीर नोटीस मिळाली असताना कायद्याने उत्तर दिलं पाहिजे. भावनिक उत्तर दिल्यास त्यावर लोकांचा विश्वास बसणार नाही,” असं फडणवीस यावेळी म्हणाले.
पत्रावाला चाळ गरिब मराठी माणसाचा प्रश्न होता. अनेक वर्ष हा प्रश्न भिजत पडला. ज्यांनी स्वत:ला गरिब माणसांचा मसिहा घोषीत केलं, त्यांनीच गरिबांचे इंटरेस्ट बिल्डरांच्या घशात घातले असा आरोपही फडणवीस यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले, “मराठी माणसाच्या नावावर राजकारण करायचं आणि मराठी माणसाला लुटायचं हा धंदा मुंबईत कोण करतंय हे आता स्पष्ट होत आहे”.
दरम्यान, संजय राऊतांनी यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केलेले आरोप हास्यास्पद असल्याचं फडणवीस म्हणाले. “ते कोणत्याच आरोपाचा पुराव देऊ शकले नाहीत. राज्य सरकारकडून सोमय्या आणि त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सांगितले की चुकीची कारवाई करता येणार नाही,” असेही ते म्हणाले. काळजी करायचं कारण नाही, कारण कितीही दाबावाची कारवाई केली तरी सोमय्या बोलायचे बंद करणार नाहीत, असंही फडणवीस म्हणाले.

Leave a Reply