महिलेच्या सतर्कतेने टळला मोठा रेल्वे अपघात

लखनौ : २ एप्रिल – एटा ते आगरा मार्गावर जाणाऱ्या एका रेल्वेगाडीचा काल एक प्रचंड मोठा अपघात होता होता टळलाय अवागढ ब्लॉक क्षेत्रातलं गाव नगला गुलारिया जवळ रेल्वेचा रुळ एका ठिकाणी तुटलेला होता. त्या गावातल्या एका महिलेने हे हेरलं. समोरुन रेल्वे येत होती. या महिलेने लाल रंगाची साडी नेसली होती. तिने तात्काळ आपली साडी फेडली आणि रुळाच्या मधोमध साडी बांधून ठेवली आणि चालकाला धोक्याचा इशारा दिला. चालकाने तो ओळखला आणि गाडी वेळीच थांबवली.
वरील घटना काल्पनिक नाही किंवा कोणत्या चित्रपटातला प्रसंगही नाही. ही एक सत्य घटना आहे. वृत्तानुसार, सोमवती नावाच्या एका महिलेने आपले प्रसंगावधान दाखवत रेल्वेचा मोठा अपघात टाळला आहे. सकाळी ८.२० वाजता नगला गुलरिया गावात ट्रेन पोहोचली. याच दरम्यान ओमवती आपल्या शेताकडे चालल्या होत्या. तेवढ्यात त्यांची नजर पडली या तुटलेल्या रेल्वेच्या रुळावर. त्यांना ते लक्षात आलं आणि त्यांनी आपल्या अंगावरची लाल साडी फेडली आणि रुळाच्या मध्यभागी झेंड्याप्रमाणे रोवली. हे पाहून चालकानेही धोक्याचा इशारा जाणला आणि वेळीच गाडी थांबवली.
एटा स्थानकावरून सकाळी साडेसात वाजता १५० प्रवासी आग्र्याकडे रवाना झाले होते. महिलांचं धाडस आणि प्रसंगावधानामुळे मोठं संकट टळलंय. चालकाने गाडी थांबवल्यावर त्यालाही माहित नव्हतं की नक्की काय झालंय. त्याने गाडी थांबवून जेव्हा खाली उतरून चौकशी केलं, तेव्हा त्याला रुळाबद्दल कळलं. ते पाहून तोही चक्रावला आणि सोमवतींच्या प्रसंगावधानामुळे बक्षीस म्हणून १०० रुपये दिले आहेत. त्यानंतर नगला गुलारिया इथं रुळ तुटल्याची माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी अर्ध्या तासात रुळ दुरुस्त केला आणि वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

Leave a Reply