हा शरद पवारांचा उघड ढोंगीपणा – विवेक अग्निहोत्री

मुंबई : १ एप्रिल – सध्या देशात ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपट तुफान कमाई करत असताना विरोधकांनी मात्र स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हा चित्रपट पाहण्यास सांगत असल्याने आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आतापर्यंत अनेकदा या चित्रपटाचा उल्लेख करत विरोध दर्शवली आहे. नुकतंच त्यांनी या चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी देण्याची गरज नव्हती असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. त्यांच्या या टीकेला आता चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीच उत्तर दिलं आहे.
‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा आधार घेत भाजपा गैरप्रचार आणि गैरसमज पसरवत असून देशात विषारी वातावरण निर्माण करत असल्याचा गंभीर आरोप शरद पवार यांनी गुरुवारी केला. दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाच्या कार्यक्रमात पवार बोलत होते. शालेय अभ्यासक्रमातून भाजप लहान मुलांची मने कलुषित करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करत शरद पवारांच्या या टीकेला उत्तर दिलं आहे. काही दिवसांपूर्वी मी त्यांची आणि त्यांच्या पत्नीची विमाना प्रवासात भेट घेतली असता त्यांनी चित्रपटासाठी अभिनंदन करत आशीर्वाद दिल्याचं विवेक अग्निहोत्री यांनी सांगितलं आहे. तसंच ढोगींपणा असल्याची टीकाही केली.
ते म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी विमान प्रवासादरम्यान मी शरद पवार आणि त्यांच्या पत्नीची भेट घेतली होती. यावेळी मी पाया पडलो असता दोघांनीही माझं अभिनंदन करत मला आणि माझी पत्नी पल्लवी जोशीला शुभेच्छा दिल्या होत्या. मीडियासमोर त्यांना काय झालं माहिती नाही. उघड ढोंगीपणा दिसत असतानाही मी त्यांचा आदर करतो,” असं विवेक अग्निहोत्री म्हणाले आहेत.
दरम्यान शरद पवार यांनी दिल्लीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत बोलताना केलेल्या वक्तव्यावरही विवेक अग्निहोत्री यांनी भाष्य केलं. यावेळी संबोधित करताना शरद पवार म्हणाले होते की, “आज देशातील द्वेष आणि खोट्या राजकारणाच्या काळात तरुणांनी एकजूट होणं गरजेचं आहे. काश्मिरी पंडितांची मदत करण्याऐवजी त्याचा राजकीय फायदा घेणाऱ्या आणि सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करणाऱ्या सरकारविरोधात केवळ युवा शक्तीच सत्य आणि एकतेच्या आधारे सामना करु शकते”.
विवेक अग्निहोत्री ट्वीट करत म्हटलं आहे की, “आदरणीय शरद पवारजी, भारतासारख्या गरीब देशात तुमच्या मते एका राजकीय नेत्याने आपल्या बळावर कमावलेली किती कमाई, जास्तीत जास्त संपत्ती असली पाहिजे? भारतात इतकी गरीबी का आहे हे तुमच्यापेक्षा जास्त चांगलं कोणाला माहिती असेल. देव तुम्हाल दिर्घायुष्य आणि सद्बुद्धी देवो”.

Leave a Reply