परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्या विद्यार्थी आणि शिक्षणविभागाला शुभेच्छा

नवी दिल्ली : १ एप्रिल – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परीक्षा पे चर्चा या आपल्या कार्यक्रमाच्या ५व्या भागामध्ये देशभरातल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा माझा अत्यंत आवडता कार्यक्रम आहे. पण करोनामुळे मी तुमच्या सारख्या माझ्या सहकाऱ्यांना भेटू शकलो नाही. आज होणारा हा कार्यक्रम माझ्यासाठी खूप आनंददायी आहे, कारण मोठ्या अंतरानंतर आपल्याला भेटण्याची संधी मिळत आहे. ते पुढे म्हणाले की, सणांच्या दरम्यानच परीक्षा असतात. त्यामुळे सणांची मजा घेता येत नाही. पण जर परीक्षांनाच आपण सण बनवलं तर त्यात अनेक रंग भरले जातात.
पंतप्रधान मोदी यांनी कार्यक्रमाच्या शेवटी निवेदन करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना मंचावर बोलावलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितलं की पूर्ण कार्यक्रमादरम्यान कोणत्याही विद्यार्थ्यामध्ये मला आत्मविश्वास कमी वाटला नाही. पंतप्रधानांनी विद्यार्थी आणि शिक्षणविभागाला शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता केली.
अभ्यास सकाळी करावा की संध्याकाळी, खेळण्याच्या आधी करावा की खेळण्यानंतर, उपाशीपोटी करावा की पोटभर जेवून, हे सगळे प्रश्न ऐकून त्यांना उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मला एक चित्रपट आठवतोय, ज्यात रेल्वे स्टेशनजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीला मोठ्या बंगल्यात राहण्याची संधी मिळते. तिथे त्याला झोप येत नव्हती. म्हणून तो रेल्वे स्टेशनवर जाऊन रेल्वे गाड्यांचा आवाज रेकॉर्ड करतो आणि परत येऊन तो आवाज ऐकून मग झोपी जातो. याचा आशय असा की आपल्याला आराम मिळणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी स्वतःचं मूल्यांकन करा आणि बघा की तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास केल्याने आराम मिळतोय.
पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितलं की एक दिवस तुम्ही परीक्षेलाच पत्र लिहा. त्यांनी मिश्किल अंदाजात सांगितलं की, हे प्रिय परीक्षे असं लिहून पत्राची सुरूवात करा. पुढे लिहा की मी पूर्णपणे तयार आहे, हिंमत असेल तर माझी परीक्षा घ्या. अरे तू काय माझी परीक्षा घेणार, मीच माझी परीक्षा घेईन.
पंतप्रधान मोदींनी सांगितलं की खेळल्याशिवाय तुम्ही खुलणार नाही. आपल्या प्रतिद्वंदीच्या आव्हानांचा सामना करणं आपण त्यातून शिकतो. पुस्तकं आपल्याला जे शिकवतात, ते आपण खेळाच्या मैदानातही शिकू शकतो. मात्र आता खेळण्याला शिक्षणापासून वेगळं करण्यात आलं आहे. पण आता बदल होत आहेत आणि आणखी बदल अवश्य होतील.
पंतप्रधान मोदी म्हणाले की सोशल मीडिया आणि मोबाईल गेमिंगच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठीही उपाय आहे. जेवढी मजा मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये गुंतून राहण्यात आहे, तेवढीच मजा स्वतःमध्ये गुंतण्यातही आहे. विद्यार्थ्यांनी ऑफलाईन ऑनलाईनच्या ऐवजी इनरलाईन राहायला हवं. एकाग्रतेने अभ्यास केला तर मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहता येऊ शकतं.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, मनात एक गोष्ट पक्की करून घ्या की परीक्षा हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे. आपल्या विकासाचा हा एक छोटा टप्पा आहे. या टप्प्यातून आपण आधीही गेलेलो आहोत. आपण याआधीही अनेकदा परीक्षा दिलेली आहे. जेव्हा मनात विश्वास निर्माण होतो, तेव्हा येणाऱ्या परीक्षेसाठी हा अनुभव आपली ताकद बनते.

Leave a Reply