छत्तीसगडच्या दोन तरुणींची अकोल्यात धावत्या रेल्वेतून उडी घेत आत्महत्या

अकोला : १ एप्रिल – ‘आयटीआय’चं शिक्षण घेणाऱ्या दोन तरुणींनी अकोल्यात धावत्या रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. ही घटना अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मनारखेड रेल्वे चौकी परिसरातील रात्रीची आहे. या दोन्ही मुलींनी मुंबई-कोलकाता रेल्वेमधून पाठोपाठ उडी घेत, आत्महत्या केली आहे. दोन्ही मुली छत्तीसगडच्या रहिवासी आहेत. त्यांनी रागाच्या भरात घर सोडलं होतं.
अकोल्यातील मनारखेड रेल्वे चौकी परिसरात १९ वर्षीय दोन मुलींचे मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आले. ही घटना बुधवारी म्हणजेच २९ मार्च’च्या रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले अन् घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेवून शव-विच्छेदनासाठी पाठवून पुढील तपास सुरू केला.
तपासात दोन्ही तरुणींची ओळख ओळख समोर आली. कुमारी बेबी राजपुत (वय १९, राहणार, चापा, जि. जांगिर, छत्तीसगड़) आणि कुमारी पूजा गिरी, (वय १९, राहणार, चापा, जि. जांगिर, छत्तीसगड) असं या मृत तरुणींची नावं आहेत. ‘आयटीआय’ला जातो असं सांगून या दोन्ही मुलींनी चार दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडल्या होत्या. त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत. त्यांचा शोधाशोध केल्यानंतरही त्यांचा सुगावा लागला नाही. अखेर, त्यांच्या कुटुंबीयांनी चापा पोलिस स्टेशन गाठले आणि बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली होती.
दरम्यान, या दोन्ही तरुणींनी मुंबई-कलकत्ता रेल्वे’त प्रवासात आपली जीवनयात्रा संपवली. यावेळी दोन्ही मुलींच्या अंगात ‘आयटीआय’चा गणवेश होता. असे असले तरी नेमके प्रकरण काय आहे? हे पोलिस तपासानंतरच समोर येणार आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनंत वडतकर करत आहे.

Leave a Reply