आशिष मिश्रा याच्या जामिनाला आव्हान देण्याचा निर्णय विचाराधीन – उत्तर प्रदेश सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

नवी दिल्ली : ३० मार्च – लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणातील प्रमुख आरोपी आशिष मिश्रा याच्या जामिनाला आव्हान देण्याचा निर्णय विचाराधीन असल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. दरम्यान, १० फेब्रुवारी रोजी मिश्रा याची जामिनावर सुटका झाली आहे.
लखीमपूर खीरी येथे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्यात आली होती. यात चार शेतकऱ्यांसह आठ जण ठार झाले होते. या घटनेचा सूत्रधार आशिष मिश्रा असल्याचा आरोप आहे. आशिष हा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा टेनी यांचा मुलगा आहे. आशिष मिश्रा याला जामीन देण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला दलज्योतसिंग याच्या कुटुंबीयांसह काही जणांनी आव्हान दिले होते. दलज्योतसिंग याला १० मार्च रोजी काही जणांनी मारहाण केली होती. घटनेतील साक्षीदारांना संरक्षण देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या मारहाणीप्रकरणीही उत्तर प्रदेश सरकारने न्यायालयात माहिती दिली.
दलज्योतसिंग शेतातून ट्रॅक्टरवरून परतत असताना, रस्त्यात काही जण होळीनिमित्त रंग खेळत होते. त्या वेळी काहींनी दलज्योतच्या अंगावर रंग टाकला. त्यास त्याने आक्षेप घेतला. यावरून वाद झाल्याने त्याला मारहाण करण्यात आली. लखीमपूर खीरीतील घटना आणि त्यातील आरोपी आशिष मिश्रा याचा या मारहाणीशी काहीही संबंध नाही. एफआयआरमध्येही त्याची नोंद नाही. मारहाण प्रकरणातील आरोपींना ११ मार्च रोजी अटक करण्यात आली आणि १४ मार्च रोजी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली,’ अशी माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व पीडित कुटुंब आणि सर्व साक्षीदार यांचे जबाब कलम १६४ अन्वये नोंदवून घेण्यात आलेले आहेत. या सर्वांनाच संरक्षण पुरवण्यात आले असून यंत्रणा त्यांच्या संपर्कात आहे, असे उत्तर प्रदेश सरकारच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.
आशिष मिश्रा याला विधानसभा निवडणुकीदरम्यान १० फेब्रुवारी रोजी जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मिश्रा याला जामीन देऊन उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशांकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे, असे आव्हान अर्जात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply