रश्मी शुक्ला यांच्याविरोधात नाना पटोलेंचा ५०० कोटींचा मानहानीचा दावा

नागपूर : २४ मार्च – वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाचशे कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा ठोकला आहे. नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयातील वरिष्ठ दिवाणी न्यायालयापुढे हा दावा सादर करण्यात आला आहे. याप्रकरणी न्यायालयाकडून सर्व संबंधितांना नोटीस बजावण्यात आली असून पुढील सुनावणीसाठी १२ एप्रिल ही तारीख देण्यात आली आहे.
याचिकेनुसार, शुक्ला २०१६ साली पुणे पोलीस आयुक्त असताना विरोधी पक्षातील काही नेत्यांचे फोन टॅप केले. यात त्यांनी राजकारण्यांची नावे बदलली. त्यांना काही टोपण नावे दिली आणि त्यांच्याविरुद्ध काही प्रस्ताव पारित केले. नाना पटोले यांना अमजद खान नावाच्या अंमली पदार्थ तस्कराचे नाव देण्यात आले. त्यांचाही फोन टॅप करण्यात आला. हे प्रकरण बाहेर आल्यावर विधानसभेत मोठा गदारोळ झाला. याप्रकरणी शुक्ला यांच्याविरुद्ध पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला आहे. आता पटोले यांनी या प्रकरणी अब्रुनुकसानीचाही दावा ठोकला आहे.
या सगळ्या प्रकारामुळे आपली प्रतिमा मलीन झाली आहे आणि शुक्ला त्याला कारणीभूत आहेत, असे नमूद करत पटोलेंनी शुक्ला यांच्यावर पाचशे कोटी रुपयांचा दावा सादर केला आहे. या प्रकरणी अॅड. सतीश उके यांनी पटोलेंची बाजू मांडली. न्यायालयाने या प्रकरणी शुक्ला, केंद्रीय गृह विभागाचे सचिव, राज्य गृह विभागाचे अतिरिक्त सचिव, नागपूर आणि पुणे शहर पोलीस आयुक्त आणि पुणे गुन्हे शाखा पोलिसांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी १२ एप्रिलला होणार आहे.

Leave a Reply