सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांचे निधन

नाशिक : १६ मार्च – माजी मंत्री आणि सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांचे आज वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने सहकार क्षेत्राला संजीवनी देणारा महर्षी हरपल्याच्या भावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. कोल्हे यांचा जन्म कोपरगाव तालुक्यातील येसगाव सारख्या छोट्याशा खेडेगावात झाला. ग्रामीण जीवनाचा बाज अंगी बाळगत त्यांनी धाडसाने सर्वच क्षेत्रात काम केले. कोल्हे यांनी दीर्घकाळ कोपरगावचे (जि. अहमदनगर) प्रतिनिधीत्व केले. कोपरगावचे सरपंच ते त्याच तालुक्याचे सहावेळा आमदार असा विलक्षण प्रवास त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरुवातीच्या काळापासून काम केले. कोल्हे यांचे सहकारातील योगदान अतिशय मोठे आहे. 1960 मध्ये त्यांनी संजीवनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. त्यानंतर अनेक सहकारी संस्था उभ्या केल्या आणि सक्षमपणे चालविल्या.
माजी मंत्री कोल्हे यांनी शिक्षण संस्था स्थापन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च आणि दर्जेदार शिक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न केला. सहा वेळा ते कोपरगावचे आमदार होते. या काळात महसूल, कृषी, परिवहन, उत्पादन शुल्क या खात्याचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. बी.एस्सी. अॅग्रिकल्चरची पदवी संपादन केलेले कोल्हे यांचे शेती, सहकार, पाणी, साखर, जागतिकीकरण अशा विविध क्षेत्रात मोठे काम केले.
येसगावचे सरपंच ते मंत्री आणि इतरही अनेक महत्वाच्या संस्थांचे पदाधिकारी म्हणून त्यांनी मजल मारली. त्यांच्या कार्यामुळे त्यांचा विविध पुरस्काराने सन्मान देखील करण्यात आला. त्यांच्या निधनाने सहकार, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने कोल्हे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मी व माझे कुटुंबीय कोल्हे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, असे मंत्री छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
कोपरगावचे सरपंच ते त्याच तालुक्याचे सहावेळा आमदार असा विलक्षण प्रवास त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरुवातीच्या काळापासून काम केले. कोल्हे यांचे सहकारातील योगदान अतिशय मोठे आहे. 1960 मध्ये त्यांनी संजीवनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. त्यानंतर अनेक सहकारी संस्था उभ्या केल्या आणि सक्षमपणे चालविल्या.
– छगन भुजबळ

Leave a Reply