शिवसेनेची अवस्था काँग्रेससारखी दयनीय होणार आहे – रामदास आठवले

नाशिक : ११ मार्च – शिवसेनेची अवस्था काँग्रेससारखी दयनीय होणार आहे. लोकसभा निवडणुकीत तीन-चार जागा निवडणूक येतील की नाही, अशी शक्यता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलीय. ते नाशिकमध्ये बोलत होते. हे टाळण्यासाठी शिवसेनेने भाजपसोबत यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. आठवले म्हणाले की, 4 राज्यात भाजपचा दणदणीत विजय झाला. यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात आहे. त्यांनी वेगवेगळ्या योजना आणल्या. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी गुंडाराज संपवले. त्यांनी केलेल्या विकासकामामुळे यूपीमध्ये भाजपचा विजय झाला. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला सत्ता मिळाली. मी बोललो होतो, पण ते झाले नाही आणि आप सत्तेत आली. त्याबद्दल आठवले यांनी केजरीवाल यांचे अभिनंदनही केले. पंजाबमधील लोकशाहीचा कल आम्हाला मान्य आहे. ही निवडणूक 2024 च्या लोकभेची चाचणी होती. आता दोन वर्षांनी भाजपला 400च्या वर जागा मिळतील असा दावाही आठवले यांनी केला.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, लोकांना काँग्रेस नको होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी कायदे मागे घेतले. मात्र, पंजाबमध्ये भाजपची ताकद कमी पडली. पुढच्यावेळी आम्ही आम आदमी पक्षाला सत्तेतून बाहेर करू, असा इशाराही त्यांनी दिला. राहुल गांधी भाजपला विरोध करतात. मात्र, त्यांचेच नुकसान होतेय. प्रियांका गांधी यांचीही जादू उत्तर प्रदेशमध्ये चालली नाही. काँग्रेस पक्ष आता दिसेनासा झाला आहे. पक्षाला नेतृत्व मिळणे अशक्य आहे. काँग्रेसची अवस्था दयनीय झाली आहे. राहुल गांधी यांनी उठसूट नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करू नये. त्यामुळे भाजपचा फायदा होतो, असा दावा त्यांनी केला.
मंत्री आठवले म्हणाले की, युक्रेन आणि पाकिस्तानच्या मुद्द्यावर काँग्रेसने सरकारच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला यश मिळणे अशक्य आहे. काँग्रेसला नवीन नेतृत्वाची गरज आहे. मात्र, काँग्रेसमध्ये एकही सक्रिय नेता नाही. आता काँग्रेसला भवितव्य नाही. शिवसेनेची अवस्थासुद्धा काँग्रेससारखी दयनीय होणार आहे. लोकसभेत तीन ते चार जागा येतील की नाही, याची शाश्वती नाही. त्यामुळे भाजप-शिवसेनेने अडीच-अडीच वर्षांच्या समीकरणावर एकत्र यावे. याबद्दल खासदार संजय राऊत भेटले, तर त्यांना सूचना करत असतो, अशी माहितीही त्यांनी दिली.
आठवले म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यावर ईडीचे छापे त्यांच्या अनियमित व्यवहारामुळे पडत आहेत. यात सरकारचा संबंध नाही. आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही. चुकीच्या पद्धतीने पैसे कमावलेले नेते जेलमध्ये जातील, असा इशारा त्यांनी दिला. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे ते नारायण राणे यांच्या बंगल्याचे काम चुकीचे आहे असे म्हणतात. मात्र, त्यांना उत्तर द्यायला राणे सक्षम आहेत. आम्ही आगामी निवडणूक भाजपसोबत लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply